माणसाच्या जीवनात सदैव शोध आणि त्याचे सततचे प्रयत्न हे त्या सुख आणि समाधानाच्या प्राप्तीसाठी चाललेले असतात. पण इतकी धावपळ करून ते सुख आणि समाधान हे माणसाला मिळतेच असे नाही. ते नेमकेपणाचे त्यास मिळत नाही कारण आपण ते शोधण्याची मिळवण्याची जागा त्याचं ठाणं चुकत असतो.
एकदा एक संसारी भक्त एका महाराजांकडे आला. त्याने महाराजांना विचारले की, महाराज! मी खूप प्रयत्न करून ही मला हवं असणार खरं समाधान हे अजून का मिळत नाही? महाराज म्हणाले, तुला खरं तर जे सुख आणि समाधान हे हवं आहे ना. ते तुला शोधूनही मिळत नाही. कारण, तुझी ते शोधण्याची जागा चुकते आहे. बाबारे संतती संपत्ती मान सन्मान। हे नव्हे चि समाधानाचे ठाण।।
हे तुला अजून कळलेले नाही. ही चूक फक्त तुझ्याच हातून होते असे नाही, तर जवळ जवळ प्रत्येक मनुष्य हा ती समाधानाची जागा त्याच ठाणं हे शोधण्याची चूक करत असतो. कारण, माणसाला असं वाटत असत ही संततीचा लाभ झाला म्हणजे मिळाले समाधान. ते पिता माता झाल्याचं समाधान जीवाला मिळतही. पण ते फार अल्पकाळ. कारण, जेव्हा त्या संततीच्या पालन पोषणासाठी त्याला काबाडकष्ट करावे लागतात, तेव्हा त्याला कळतं तेच संपत्तीच्या बाबतीतही.
ती कितीही मिळाली तरी धनाची तृष्णा ही कधी पूर्ण होत नाही. उलट ते जसे जसे जास्त मिळेल तशी ती धनतृष्णा जास्तच वाढत जाते. जीवास घरादारात मिळणारा नाम, सन्मान हासुद्धा त्यास कायमचे समाधान देत नाही. या संसार-प्रपंच्यातला नाना वस्तू, व्यक्ती, साधने ही आपल्याला कधीच पूर्ण समाधान देऊ शकत नाहीत. कारण, ती फक्त सुख या कल्पनेस सुखावणारी साधने असतात. ती असतात तोवर ताच समाधान आहे असं वाटत पण ते असतच असंही नाही.
जगाच्या बाजारपेठात सुखाची समाधानाची साधने विकत मिळतात. पण कोठे ही समाधान हे विकत मिळत नाही. कारण त्याची जागा ही बाह्य वस्तूत नाही तर ती तुमच्या अंतरंगात आहे. समाधान ही अंतरिक सुखाची अनुभूती आहे. तीच तुम्हाला खरे सुख म्हणजे काय ते देते.