एकदा एक श्रीमंत माणूस शिर्डीत साईबाबांच्या दर्शनास आली. साईबाबांचे दर्शन घेत तो म्हणाला, “”बाबा! मी तुमच्याकडे कोणतीही ऐहिक मागणी करायला आलेलो नाही, माझी तुमच्याकडे इतरांच्या पेक्षा फार वेगळी मागणी आहे. मला ब्रह्म म्हणजे काय ते तुम्ही दाखवा.” त्याचे ते बोलणे ऐकून बाबा त्याला म्हणाले, “”वा! खरंच तू एकच असा आहेस की जो माझ्याकडे अशी पारमार्थिक मागणी करायला आला आहेस. तेव्हा थोडा थांब, मग मी तुला ती ब्रह्मज्ञानाची गुंडाळी उघडून दाखवतो. तुला ब्रह्म दाखवतो.”
असे म्हणून त्या व्यक्तीस एका बाजूस बसायला सांगितले. थोडा वेळ असाच गेला आणि बाबांनी काय केले. त्यांनी एका छोट्या मुलाला जवळ बोलावले. त्याला सांगितले की, “”बाळ! त्या नंदू व्यापाऱ्याकडे जा, तो नसेल तर बाळा वाण्याकडे जा आणि त्यांच्याकडून पाच रुपये हात उसने मागून आण. म्हणावं बाबांना पैसे हवेत.”
तो मुलगा बाबांच्या सूचनेप्रमाणे नंदू व्यापारी अन् वाणी या दोघांकडे गेला खरा; पण दोन्हीकडून हात हलवतच परत आला. इकडे ती ब्रह्मज्ञान मागणारी व्यक्ती विचार करू लागली की, हा असला प्रकार! एका फकिराने पाच रुपये आणि तेही असे हात उसने लोकांच्याकडे मागावेत म्हणजे कमालच झाली.
हे नाटक म्हणजे खरं तर खिशात नोटांची पुडकी बाळगून समोर बसलेल्या आणि ब्रह्मज्ञानाची मागणी करणाऱ्या त्या गृहस्थाची परीक्षा घेण्यासाठीच बाबांनी चाललेले होते. पण त्याला मात्र त्याचा जराही गंध नव्हता. उलट तो गृहस्थ आता काहीसा स्पष्टपणे बाबांना म्हणाला, “”बाबा, तुम्ही मला ब्रह्म दाखविणार होतात ना, मग त्याचं काय झालं? मी तुमच्या समोर खोळांबून बसलोय.”
तेव्हा बाबा काहीसे समजावणीच्या सुरात त्यास म्हणाले की, “”तू ब्रह्म पाहायला खोळांबला आहेस हे मला ठाऊक आहे. पण तुला हे माहीत नाही की ब्रह्म हे काही असे वाटेवर पडलेले नाही. काही मागण्या आधी काही द्यावे लागते. अरे तुला जिथे खिशात नोटांची पुडकी असूनही साधे पाच रुपये मला देण्याची बुद्धी झाली नाही. अशा स्वार्थी, लोभी, अहंकारी माणसाला ते ब्रह्म तरी कसे दिसणार आणि दाखविणाऱ्याने तरी का दाखवावे? ब्रह्मज्ञान हवे असेल तर त्यासाठी पंचप्राण आणि पंचेंद्रियांचे समर्पण करावे लागले. ती पाचाची खूण ज्याला समजते त्यालाच ब्रह्म दिसते आणि दाखविता येते.”