जन्मला, जगला आणि मेला असे “कर मर कर’ हे फार पाहायला मिळतात. फार थोडी मंडळी अशी आहेत की, ज्यांना जन्मल्याचा, जगल्याचा आणि अखेर मेल्याचाही आनंद होणारी जीवनकला आत्मसात झालेली असते. प्राप्त जीवन हे जगायचं कसं आणि त्यातल्या प्रत्येक क्षणाचा सुखानंद हा कसा घ्यायचा, ही एक जीवनकला आहे. ती कला साधू, संत, सद्पुरूष आणि जीवाचे खरे उद्धारक, मार्गदर्शक यांच्याकडून शिकून घ्यावी लागते.
ही जीवन जगण्याची जीवनकला आपल्याला शिकवताना स्वत: त्यानुसार जगलेली ही अनुभवी मंडळी आपल्याला हेच सांगतात की, बाबांनो! मानवी जीवन हे केवळ तीन काळात सामावलेले आहे. जो घडून गेला तो भूतकाळ, जो घडतोय तो वर्तमानकाळ आणि जे घडणार आहे तो भविष्यकाळ. या “काल, आज आणि उद्या’ मध्येच अवघे मानवी जीवन सामावलेले आहे.
काळ अतिशय गतिमान आहे. तो कोणासाठी थांबत नाही. त्याला थांबवता येत नाही. गेलेली वेळ, गेलेला क्षण हा जीवनात परत येत नाही. म्हणूनच जीवनातला एकही क्षण वाया न घालविता तो सत्कारणी लावणे, प्रभू प्रेमाने, चिंतनाने भरून घेणे हीच खरी जीवनकला आहे. जे घडले ते का घडले, कशामुळे घडले याचा विचार न करता त्यातून बोध घेऊन पुढे जायचे असते. झालेल्या चुकांतून काहीतरी नव्याने शिकायचे असते. कालच्या चुका आपल्या हातून उद्या घडू नयेत यासाठी आज सतर्क राहावे लागते. हे कसे साधायचे या गोष्टी अभ्यासाने आत्मसात कराव्या लागतात. साधू, संत आणि सद्गुरूंची जीवनकला ते कसं करायचं, साधायचं हे आपल्याला शिकवीत असते. आळस, झोप, निष्क्रियता या शत्रूंपासून फार सावध राहावे लागते. ते माणसाचे बहुमोल आयुष्य बरबाद करतात. आळस, टाळाटाळ, आज नको उद्या पाहू, उद्या करू ही बेफिकीरी घातक ठरते.
कारण आळशी माणसाचा क्रियाशील उद्या कधीच उगवत नसतो. त्यासाठी संत कबीरांसारखे द्रष्टे पुरुष हे माणसाला लाख मोलाचा सल्ला देतात की- “कल करे सो आज कर. आज करे सो अब, पलमें प्रलय होये तो कल करोगे कब।’ इथं उद्याचा भरवसा नाही. त्यासाठीच जीवनकलेचा हाच धडा आहे की जे करायचे ते उद्या नाही तर आज आणि आताच करा.