Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्याकडे कूच केली आहे. मात्र त्यापूर्वीच पहाटे 4 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे हजारो मराठा आंदोलकांना सोबत घेत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या ते भांबेरी या गावात पोहोचले आहेत. आता मनोज जरांगे पाटील आज 11 वाजण्याच्या सुमारास भांबेरी गावातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सागर बंगल्यावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शैलेंद्र पवार, श्रीराम कुरणकर आणि बाळासाहेब इंगळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या तीन सहकाऱ्याची नावं आहेत. तीर्थपुरी गावातून शैलेंद्र पवार यांना तर अंबड शहरातून बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी म्हणून ते सातत्याने सोबत होते. रात्रीही भांबेरी गावात जरांगे पाटील यांच्या सोबत हे दोन्ही सहकारी होते. मात्र, मुंबईला जाण्यासाठी रात्री हे घरी गेले असताना त्यांना पहाटे चार वाजता पोलिसांनी तब्यात घेतले आहे.
भांबेरी गावात पोलिस बंदोबस्त
पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जरांगे मुंबईत येण्याआधी सागर बंगल्यावरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी भांबेरी गावात रात्रभर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.