जालना – मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवाली सराटी (Sarati) गावात जाहीर सभा घेतली आहे. यावेळी मोठ्या संख्येने लोक सभास्थळी उपस्थित राहिले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जरांगे पाटील यांनी यावेळी थेट पंतप्रधान मोदींसह अमित शहांवर देखील निशाणा साधला.
जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी यावेळी केंद्रातील नेत्यांसह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधला. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही असं देखील जरांगे यावेळी म्हणाले. सत्ताधाऱ्यांना उद्देशून जरांगे यावेळी म्हणाले,”देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो, या राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाची विनाकारण हालअपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घ्यावा”
जरांगे पाटील पुढे म्हणाले,” सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा जाहीर निर्णय करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहण्याची आता आमची तयारी नाही,”
काही दिवसांपूर्वी केलेल्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेतले. आज पुन्हा एकदा जाहीर सभेतून जरांगे यांनी तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.तसेच मराठा समाजाने सज्ज व्हावं पुढची दिशा 22 ऑक्टोबरलाच सांगितली जाईल असंही जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.