नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर हे त्यांच्या बेताल आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हणत मणिशंकर अय्यर यांनी मोठा वाद निर्माण केला होता. 2019 च्या निवडणुकीत सॅम पित्रोदांनी वाद निर्माण करून कॉंग्रेस आणि खासकरून राहुल गांधींना अडचणीत आणले.
1984 च्या हिंसाचाराबद्दल हुआ सो हुआ असे बेदरकार विधान पित्रोदा यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे शीखबहुल मतदारसंघांत कॉंग्रेसची मोठी पंचाईत निर्माण झाली. त्यांच्या विधानानंतर निर्माण झालेल्या वादानंतर मला हिंदी फारसे येत नाही, वाक्याची जुळवाजुळव करताना गडबड झाली, अशी सारवासारव पित्रोदा यांनी करण्याचा प्रयत्न केला. पित्रोदा यांच्या विधानामुळे कॉंग्रेस अडचणीत आली हे कळाल्यानंतर राहुल गांधींनी पित्रोदा यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते.
पित्रोदा यांनी त्यानंतर दिलगिरीही व्यक्त केली होती, मात्र त्यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. मणिशंकर अय्यर यांनी निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये पोहचत असताना वादग्रस्त विधाने करत पक्षाला पुन्हा अडचणीत आणले.
2014 च्या निवडणुकीत मोदींना नीच म्हणणाऱ्या अय्यर यांनी 2019 च्या निवडणुकीत आपले नीच वाले विधान योग्य होते. याबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशी उद्धटपणे वागत अंगावर हातवारे करत आय हेट यू असं रागारागाने म्हणत अय्यर तिथून निघून गेले होते. कॉंग्रेसचे निकटवर्तीय असलेले पित्रोदा आणि कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या या विधानांचा कॉंग्रेसवर विपरीत परिणाम झाला.