मुंबई – राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मोठे मताधिक्य मिळाल्यामुळे आर्थिक क्षेत्रातील सुधारणा नेटाने राबविल्या जातील. त्यामुळे कंपन्यांचा नफा वाढेल आणि शेअरबाजाराचे निर्देशांक आगेकूच करतील. एक वर्षाच्या काळात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 45 हजारांवर जाईल, असे विश्लेषण करणाऱ्या संस्थांना वाटत आहे.
मॉर्गन स्टॅनली यांनी सध्याची परिस्थिती आणि आगामी काळ या आधारावर जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या संस्थेने म्हटले आहे की 2020 पर्यंत सेन्सेक्स 45 हजार अंकांची पातळी गाठू शकतो.
गेल्या पाच वर्षात सरकारने ज्या पद्धतीने काम केले आहे त्याच पद्धतीने आगामी काळात काम करण्याची गरज आहे. महागाईवर नियंत्रण, तुटीवर नियंत्रण, पायाभूत सुविधासाठी खर्च आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचे काम चालूच ठेवावे लागणार आहे.
सध्याच्या सरकारचा इरादा पाहता सरकार या सर्व आघाड्यावर आगामी काळात काम करण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून येत असलेल्या माहितीनुसार सरकारने याबाबत अगोदरच काम सुरू केले आहे.
देशांतर्गत परिस्थिती कार्यक्षमरीत्या हाताळली गेली तरी सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही बाबींचा सामना करावा लागणार आहे. त्यातील एक बाब म्हणजे क्रूड तेलाचे वाढते दर होय.तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारला करताना बरीच कसरत करावी लागणार आहे. तरीही सरकारच्या काही मर्यादा आहेत.
दुसरी बाब म्हणजे जागतिक पातळीवर अनेक मोठ्या देशांत व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. विविध देशादरम्यान चालू असलेल्या व्यापारयुद्धात भारताने निर्यात वाढवण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार सरकारला करावा लागणार आहे. त्याचबरोबर भारताचे अमेरिका आणि काही देशाबरोबर व्यापारासंदर्भात मतभेद आहेत. ते सोडविण्यासाठी या सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत