पुणे -नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना, शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी बाजारात झुंबड उडत आहे. त्यातच विद्यार्थ्यांनी ठराविक दुकानातूनच साहित्य खरेदी करावे, याबाबत शाळांकडून सक्ती केली जात आहे. पालकांनी तक्रारी दाखल केल्यास शिक्षण विभाग कारवाई करणार आहे. दरम्यान, दरवर्षीच अशी स्थिती असताना शिक्षण मात्र “समजूत’ काढण्याची भूमिका घेत आहे.
शाळा दि.15 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने वह्या, पुस्तके, गणवेश, बॅगसह अन्य शालेय साहित्य खरेदीसाठीही दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान काही शाळांकडून साहित्य खरेदीसाठी ठराविक दुकाने ठरवून दिली जात आहेत. या दुकानांचे थेट शाळांबरोबरच “टाय-अप’ झालेले असते. संबंधित दुकानांमध्ये साहित्याचे दरही जास्त लागू केलेले असतात. बाजरापेठेतील अन्य दुकानात या साहित्यासाठी त्यातुलनेत दर कमी असतात. मात्र, या दुकानांमधून साहित्य खरेदीसाठी इच्छा असतानाही विद्यार्थी, पालकांना जात नाही. पालकांना आर्थिक भुर्दंडच सोसावा लागत आहे. शाळांकडून शालेय साहित्य खरेदीसाठी विशिष्ट दुकानांचीच सक्ती केली जात असल्याची आरडाओरड पालकांकडून केली जात आहे. पालकांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक यांच्याकडे शाळांविरुद्ध तक्रारी करण्याचे धाडसही दाखविले पाहिजे.
शालेय साहित्य खरेदीसाठी ठराविक दुकानांचीच सक्ती केली जात असल्याबाबत अद्याप माध्यमिक शिक्षण संचालनालयाककडे पालकांकडून काहीच तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. तक्रारी दाखल झाल्यास त्यावर आवश्यक ती कार्यवाही नक्कीच करण्यात येणार आहे. संबंधित शाळांवर कारवाई करण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात आहे.
– संपत सूर्यवंशी,संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय