शिर्डी – निळवंडे कालव्याच्या पाण्यासाठी संघर्ष व शासनदरबारी पाठपुरावा करून जिरायत भागाला वरदान ठरणारे निळवंडे प्रकल्प पूर्णत्वाकडे नेला. अनेक वर्षांपासून निळवंडेचे पाटपाणी येण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी हा सुवर्णक्षण असून, जनतेचा आनंद ही आपल्या कामाची पावती आहे, असे प्रतिपादन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.
चितळे येथील निळवंडे कालव्याच्या रेल्वे बोगद्याचे भूमिपूजन खा. लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. खा. लोखंडे म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाच्या श्रेयवादात मला पडायचे नाही. जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखविला आहे. प्रवरा व गोदावरी लाभदायक शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार असताना कुकडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.
त्याचा अनुभव मला निळवंडे धरणाचा काम पूर्ण करण्यासाठी आला. निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतात जोपर्यंत पाटपाणी जात नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. माझा लढा सुरूच राहणार असून, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असे सांगत 182 गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचे पाणी मिळाले हा जीवनातील सर्वात मोठा आनंद असल्याचे खा. लोखंडे यांनी यावेळी सांगितले.
या वेळी कृती समितीचे सदस्य सोपान वाघ म्हणाले की, खा. लोखंडे यांनी रेल्वे विभागाची एक वर्षातच परवानगी मिळून या बोगद्याचे भूमिपूजन केले. या कामामुळे येथील शेतकऱ्यांना निळवंडेचे पाट पाणी जाण्यासाठी मदत होणार आहे. खा. लोखंडे यांनी अनेक वर्ष रखडलेला प्रकल्पाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत कृती समितीला बरोबर घेऊन काम पूर्णत्वास नेले. त्यांच्या माध्यमातून शेवटच्या टेल शेतकऱ्यापर्यंत निळवंडेचे पाणी नक्कीच पोहोचेल, असा विश्वास वाघ यांनी या वेळी व्यक्त केला.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, राजेंद्र देवकर, जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात, बापूसाहेब शेरकर, राजेंद्र सोनवणे, संतोष डहाळे, मीनाकाकी जोंधळे, शहरप्रमुख सागर बोठे, सुधीर वायखंडे, उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे, देवा लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विठ्ठलराव घोरपडे यांनी केले.सूत्रसंचालन रवींद्र वाघ यांनी केले.
आता लढाई घाट माथा पाणी वळवण्याची!
53 वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे प्रकल्पाची लढाई सर्वांना सोबत घेऊन जिंकली. आता घाटमाथ्याचे वाहून जाणारे पावसाचे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करणार असून, हा घाट माथा पाणीप्रश्न मार्गी लागेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले.