नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी हातमिळवणी करण्याच्या प्रस्तावावर कॉंग्रेसने गुरूवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे त्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-डाव्या पक्षांची आघाडी निश्चित झाली.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या हालचाली आधीपासूनच कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या गोटात सुरू होत्या. डाव्या पक्षांनी तयारी दर्शवल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रदेश शाखेने तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला. त्या प्रस्तावाला पक्षश्रेष्ठींनी औपचारिक मान्यता दिल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी यांनी ट्विटरवरून दिली.
बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आहे. त्या पक्षापुढे यावेळी भाजपने जोरदार आव्हान उभे केले आहे. आता कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र आल्याने त्यांची आघाडीही मोठी राजकीय शक्ती ठरणार आहे.
त्यामुळे बंगालमधील आगामी निवडणुकीत तिरंगी मुकाबला होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये कॉंग्रेस आणि डावे पक्ष स्वतंत्रपणे लढले. मात्र, त्यांची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्यातून धडा घेऊन ते पक्ष एकत्र आल्याचे मानले जात आहे.