-माधुरी तळवलकर
ओम पुरी आणि प्रीती खरे यांच्या सहजसुंदर अभिनयाने “हाथ पीले कर दो’ ही फिल्म प्रेक्षणीय झाली आहे. एका मध्यमवर्गीय घरात तरुण मुलीचे आईबाबा बोलताहेत. त्यांची मुलगी पाककलेच्या क्लासला जातेय. तिथे शिकलेला एक नवीन पदार्थ ती आपल्या आईबाबांना करून देते. तिच्या बोलण्यात तिच्या वर्गातील एका मुलाचे नाव वारंवार येते. त्याचा फोटोही दाखवते ती. आईचे कान टवकारतात. मुलगी तिथून गेल्यावर आई म्हणते, “हिचे हात आता पिवळे करायला हवेत. बघितलं नं, फोटोही आहे तिच्यापाशी.’
बाबा हसतात आणि म्हणतात, “प्रत्येक आईवडिलांचा हाच प्रॉब्लेम आहे. तेही कधीतरी तरुण असतात. तेही असेच वागलेले असतात पण ते हे विसरतात आणि मुलांना बंधने घालू पाहतात.’ आई तावातावाने म्हणते, “आम्ही नाही हं असे कधी वागलो. आईवडिलांच्या आज्ञेत होतो आम्ही.’
मग फ्लॅशबॅकमधून दिसू लागते, तिचा मित्र (इरफान खान) तिला रोज भेटायला येत असे. त्याच्या गाडीचा हॉर्न वाजला की, ही काहीतरी निमित्त सांगून घरातून बाहेर पडत असे. दोघे लग्न करायचे ठरवतात. पण एकदा आईच्या हे लक्षात येते आणि ती तिला मारून कोंडून घालते. नवऱ्याला जेवायला वाढत असताना म्हणते, “मुलगी आता मोठी झाली. तिचे लग्न करायलाच हवे. तुम्ही बघा कुणी ओळखीचे असेल तर…’ वडील विचारतात, “काही झालेय का?’ “होईपर्यंत वाट बघायचीय का? लग्न करून टाकू तिचे.’ ती उत्तरते.
तिचा मित्र तिला भेटण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो पण दोघांची भेट होऊ शकत नाही. तिचे दुसऱ्याच एका मुलाशी लग्न करून टाकतात. आता तीही एका तरुण मुलीची आई झालीय. मुलीवर बारीक लक्ष. फोनवर कुणाशी बोलते, कुणाला भेटते…
आणि एक दिवस पुन्हा तोच प्रसंग. नवऱ्याला जेवण वाढत असताना म्हणते, “तिच्या लग्नाचे पाहायला हवे. कुणी मुलगा असला तर पहा ओळखीतला.’ बाबा विचारतात, “काही झालंय का?’ तिचेही उत्तर तेच, “होईपर्यंत वाट बघायचीय का?’
पंचवीस वर्षांनंतरही तोच प्रसंग, तेच संवाद! पिढी बदलते, काळ बदलतो. पण माणसांचे स्वभाव बदलत नाहीत. पुढे काय होते? आई तिला गांभीर्याने घेते का? मुलीला समजून घेते का? बदलत्या काळानुसार नवीन पिढीला त्यांचे निर्णय घेऊ दिले पाहिजेत, असे तिला वाटते का? “हाथ पीले कर दो’ या कथेतून भारतीय समाजाच्या मानसिकतेवर गुलजार यांनी नेमके बोट ठेवले आहे.