श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी आज ठार केले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीमध्ये घुसल्यावर “एलएसी’पासून 100 मीटरच्या अंतरावर या दोघांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले, असे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील 370 कलम रद्द केल्याला एक वर्ष लवकरच पूर्ण होत आहे. त्यानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून या दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी केली होती, असे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे.
ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांपैकी 23 वर्षीय दहशतवाद्याचे नाव इद्रीस अहमद भट असे असून तो कुपवाडातील हंदवारा येथील रहिवासी आहे. तो 2018 मध्ये वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात गेला होता. तर दुसऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तो विदेशी असावा आणि हे दोघेही लष्कर-ए-तोयबाचे सदस्य असल्याचा संशय सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दोघांकडून एके-47 रायफल आणि शेकडो काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत.
शनिवारी ठार झालेल्या दहशतवाद्याकडूनही चिनी बनावटीचे पिस्तूल आणि ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाने बनवलेले 4 ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. जैश-ए-मोहंम्मदच्या दहशतवाद्यांनी 2001 साली संसदेवरील हल्ल्यादरम्यान वापरलेल्या ग्रेनेडसारखेच हे ग्रेनेड आहेत. शीख लाईट इन्फट्रीच्या जवानांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.