वाघोली (ता. हवेली) – येथे साधारणतः दोनशे पेक्षा अधिक गायरान जमीन असून सुद्धा मुस्लीम, ख्रिश्चन, लिंगायत, भराडी व वडार समाजाला अंत्यविधीसाठी जागे अभावी मोठा सामना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने २०९ मध्ये प्रत्येकी २० गुंठे जागा देण्यात आली. परंतु अद्यापही जागेचा ताबा मिळाला नसल्याने विविध समाजातील नागरिकांना हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली गावात जवळपास दोनशेहून अधिक गायरान क्षेत्र असून गायरान जागेत मोठ्याप्रमाणावर अतिक्रमणे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजातील ज्या लोकांना अंत्यविधीसाठी जागा नाही अशा लोकांना २००९ साली वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने जागा देण्यात आली होती. परंतु अद्यापही त्यांना अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही. वाघोली गावामध्ये विविध जातीधर्माचे लोक वास्तव्यास आहेत. लोकसंख्येच्या जवळपास २५ ते ३० टक्के लोक मुस्लीम, ख्रिश्चन, भराडी, लिंगायत समाज असून त्यांच्यासाठी अंत्यविधी करण्यासाठी अद्यापही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही.
२००९ मध्ये वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेऊन अंत्यविधी करिता विविध समाजासाठी वाघोली येथील १४१९ गट नंबर मधील प्रत्येकी २० गुंठे जागा देण्यात आली होती. तसा उल्लेखही सातबारा उताऱ्यावर आहे. परंतु देण्यात आलेली जागा केवळ कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात मात्र जागेचा ताबा समाजाला आजतागायत मिळाला नाही. विविध समाजातील लोकांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त वडगावशेरी, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
“स्मशानभूमीला जागा नसल्यामुळे विविध समाजातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधीसाठी अतिशय हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. लोकप्रतिनिधींनी शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावा करून जागेचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.” – सचिन काळे (अध्यक्ष, तंटामुक्त समिती वाघोली)