88 जणांना निवासी भूखंड प्रमाणपत्र वाटप
डिंभे/मंचर – तात्पुरते पुनवर्सन नको तर कायमस्वरूपी पुनवर्सन करा, अशी मागणी पोखरी, बेंढारवाडी, जांभोरी, काळवाडी, माळीण पसारवाडी या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, गावांचा समावेश आहे. मात्र शासनाने जमिनीची खरेदी, जमीन मालकांना द्यावयाचा मोबदला, गावचा आराखडा, घरकुलांची मंजूरी यासाठी यंत्रणेला ताबडतोब सूचना देऊन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ अहवाल मागून सूचना दिल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील धोकादायक दरडप्रवण गावातील ग्रामस्थांना सुरक्षित जीवन जगता यावे. यासाठी रविवारी (दि. 13) 88 जणांना निवासी भूखंड प्रमाणपत्र दिले. दरडप्रवण गावातील ग्रामस्थांनी शासनाला सहकार्य करून आपले घर सुरक्षीत करून घ्यावे, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यात पाच गावे दरडप्रवण क्षेत्रात येतात. यातील पोखरी अंतर्गत बेंढारवाडी व जांभोरी अंतर्गत काळवाडी या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जमीन खरेदी करण्यात आली. या कामामध्ये प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी जलद गतीने पुढाकार घेवून महसूल, नगररचना, आदिवासी विकास विभाग, बांधकाम विभाग यांच्या सहकाऱ्याने 12 मुलभूत सोयी सुविधांनी युक्त अशी घरांची रचना केली आहे. या जागेवर पाडण्यात आलेल्या निवासी भूखंडांचे वाटप दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांत अधिकारी गोविंद शिदे, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, सुभाष मोरमारे, विष्णूकाका हिंगे, प्रकाश घोलप, शरद बॅंकेचे संचालक प्रदीप आमोंडकर, रुपाली जगदाळे, प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार संजय नागटिकळ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, नायब तहसीलदार सचिन मुंढे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पवार, उपअभियंता सुरेश पटाडे, नायब तहसीलदार आर. एन. गवारी, गौतम खरात आदी मान्यवर व दरडप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती याचे भाषण झाले.
डेव्हलपमेंटच्या नावाखाली सह्याद्रीचे लचकेतोड
माळीण दुर्घटनेत 44 कुटुंबे व त्यातील 151 लोक दगावले. रायगड जिल्ह्यातील ईशाळवाडी गावावर दरड कोसळून संपुर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेले. 22 जुलै रोजी तळाये गावावर दरड कोसळून 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे सहाद्री पर्वतरांगात वसलेल्या धोकादायक गावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; मात्र या घटनेला निसर्गाचा कोप माणले जाते. दरम्यान, मानवाने केलेल्या विकृतीला निसर्गालाच जबाबदार धरले जाते. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, प्रदूषण, डेव्हलपमेंटच्या नावाखाली सह्याद्रीचे लचके तोडले जातात. खाणी, हॉटेल, ढाबे यामुळे डोंगर पर्वतांचे असतित्व धोक्यात आले आहे. यामुळे सहाद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.