पुणे – “राज्यासह देशात सुसज्ज रस्ते बांधणीचा वेग अधिक आहे. या वेगामध्ये महामार्गांवर ठिकठिकाणी स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह उभारावीत. यामुळे महिला अधिक सुखाने प्रवास करतील,’ अशी अपेक्षा विधान परिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. एनडीए चौकातील उड्डाणपूल उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “दुर्गम भागात, आपत्कालीन परिस्थितीत, विकासाचा मार्ग, आरोग्यदायी सेवा पुरवण्यासाठी, पाणी पोहोचवण्यासाठी या प्रत्येकासाठी रस्त्यांचे योगदान असते. चांगल्या दर्जाच्या रस्त्यांमुळे भारताचा चेहरा-मोहरा बदलत असून आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे जात असल्याची जाणीव होत आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये रस्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी मिळून या भागातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याला आज फळ मिळाले आहे. आम्ही फक्त रस्ते बांधत नसून देशाची बांधणी करत आहोत अशा प्रकारची भूमिका सरकारने घेतली आहे,’ असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.