पुणे – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन “घरोघरी तिरंगा’ फडकवून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच नागरिकांनीही आपल्या घरावर 15 ऑगस्टपर्यंत तिरंगा ध्वज फडकावून शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळे, शासकीय व खासगी इस्पितळे व सार्वजनिक आस्थापना तसेच खासगी आस्थापनाचे कार्यालय, कारखाने व दुकाने व घरे आदी ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांनी दि.15 ऑगस्ट रोजीचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम करताना नियमांचे पालन करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले आहे.