नगर – आरोग्य व शारीरिक शिक्षणातून विद्यार्थ्याच्या आंतरीक क्षमतांमध्ये वृद्धी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण व खेळ शाळेत महत्वाचे आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांची नेमणूक फक्त सहावी ते दहावीच नव्हे तर इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शासनाने करायलाच हवी.
सध्या करानाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षण विषयाला महत्व प्राप्त झाले असून, हा विषय शाळेत सक्तीचा करा असे, मत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व सहयोगी संघटनांच्या वतीने राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी आयोजित केलेल्या राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. लॉकडाऊन नंतर शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षणाचे महत्व व शारीरिक शिक्षकाची भूमिका या संदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकीस राज्यभरातील एक हजार शिक्षक, संघटना पदाधिकारी, सात शिक्षक आमदार व एक पदविधर आमदार उपस्थित होते.
यावेळी कोतकर म्हणाले, शालेय स्तरावर विविध विषयाच्या अध्यापनातून विद्यार्थी बौद्धीक, भावनीक, मानसिक क्षमता आत्मसात करतील. परंतु करोनाला हद्दपार करण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता विकसीत होणे महत्वाचे आहे. औषधोपचाराने विकसित झालेली प्रतिकार शक्ती अधिक काळ टिकणारी नसून योग, प्राणायम, व्यायाम व शारीरिक कसरती या माध्यमातून प्राप्त झालेली प्रतिकार शक्ती आयुष्यभर टिकणारी असते.
यावेळी आ. पाटील यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे महत्व अधोरेखीत करत जादा शारीरिक शिक्षकांची गरज भासणार असल्याचे म्हटले.
आ. सावंत म्हणाले. शारीरिक शिक्षण हा मजबूत सामाजिक विकासाचा पाया असून या विषयाच्या शिक्षकांना संच मान्यतेतून हद्दपार केल्याने तो व्यवस्थेत टिकण्यासाठी चुकीचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी एकमुखाने प्रयत्न करू असे आश्वासन आ. नागो गाणार, आ. विक्रम काळे, आ. बाळाराम पाटील, आ. श्रीकांत देशपांडे यांनी दिले.