युरोपमधील अनेक देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये ओमायक्रॉन या करोना व्हेरियंटचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारनेही हा विषय अधिक गांभीर्याने घेतल्याचे लक्षात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशवासीयांशी संवाद साधताना ज्या विविध योजनांची घोषणा केली ते पाहता केंद्र सरकारनेही सर्व तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता 15 ते 18 या वयोगटातील मुलांचेही लसीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे करोना विरूद्ध सुरू असलेला लढाईमध्ये फ्रन्टलाइन वर्कर यांना लसीकरणाचा बूस्टर डोस दिला जाणार आहे.
या नवीन संकटाविरूद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने आणि सर्वच राज्य सरकारने बूस्टर अशी तयारी केली आहे, असेच म्हणावे लागेल. आफ्रिकेमधील विविध देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनचे रूग्ण ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या प्रमाणात जरी भारतामधील परिस्थिती नसली तरी येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार राहण्यासारखी योग्य गोष्ट दुसरी कुठली नाही. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारे आपण करोनाशी लढा देत आहोत त्याचा अनुभव गाठीशी असल्याने आता करोनाच्या या दुसऱ्या व्हेरियंटशी सामना त्याच आधारे करावा लागणार आहे.
या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडली तर हा विषाणू जास्त पसरू शकत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव असल्याने त्याच पातळीवर आता काम केले जात आहे. त्याचप्रमाणे जर लसीकरण झालेल्या व्यक्तींना या विषाणूची बाधा झाली तरी पुढे संसर्ग होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, असेही लक्षात आले आहे. साहजिकच या सर्वसाधारण आणि मूलभूत उपायांचा वापर करूनच भारत सरकारने ओमायक्रॉनशी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या राज्यांमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे त्या राज्यांमध्ये विशेष केंद्रीय पथके पाठविण्यात येणार आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही चर्चा सुरू होती, ती तिसरी लाट ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या निमित्तानेच येऊ शकते अशी शक्यता असल्याने आता सर्वच यंत्रणांना मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागणार आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, त्यांनी सर्व पातळीवर नियोजन करून या विषाणूच्या विरोधात लढाई करण्याची सज्जता ठेवली असली तरी सर्वसामान्य नागरिकांनीही या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे रस्त्यावर गर्दी वाढत आहे ते पाहता आपण ओमायक्रॉनच्या संसर्गाला जाणीवपूर्वक निमंत्रण देतो आहे की काय,
अशी भीती निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेले सर्व सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ किंवा धार्मिक उत्सव असोत त्यापैकी कोठेही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले नव्हते. लग्न समारंभ असो किंवा राजकीय समारंभ, तेथील गर्दीबाबत जरी नियमावली असली तरी हे सर्व नियम पायदळी तुडवूनच लग्न समारंभ आणि राजकीय समारंभ होत आहेत हे वास्तव भीतीदायक आहे. देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेला काही प्रमाणात अशा प्रकारची गर्दीच कारणीभूत होती हा अनुभव गाठीशी असतानाही सर्वसामान्य नागरिक अजूनही या गर्दीपासून दूर राहात नाहीत किंवा या गर्दीचा आपण भाग होता कामा नये,
ही गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरत नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर जरी नवी नियमावली जाहीर केली असली, तरी त्या नियमांचे संपूर्णपणे पालन होते की नाही हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, असे वाटत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा ओमायक्रॉन विरूद्धच्या या लढ्यात आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत फक्त अधिकृत माहितीच बाहेर येण्याची गरज आहे.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर काही स्वयंघोषित तज्ज्ञ नेहमीच ओमायक्रॉनबाबत उलटसुलट विधाने करत असतात. त्यामुळे नागरिकांच्या मनातही संभ्रम निर्माण होत असतो तसेच देशातील नागरिकांना ज्या लसी देण्यात आल्या आहेत त्या लसी ओमायक्रॉनविरूद्ध लढण्यासाठी पुरेशा आहेत का बूस्टर डोसची गरज आहे याबाबत सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोसचा विचार समोर आला असेल तर नजीकच्या कालावधीमधील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस देण्याची तयारी आता केंद्र सरकारने ठेवायला हवी. एकीकडे सरकारी पातळीवर या सर्व गोष्टी होत असताना वैयक्तिक पातळीवर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी मुळीच विसरता कामा नये.
देशातील अनेक नागरिकांनी लसीकरणाचा एक डोसही अद्याप घेतलेला नाही, अशा नागरिकांनाही शोधून त्यांची लवकरात लवकर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी सरकार पातळीवरही प्रयत्न करण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोनाने जी त्रिसूत्री आपल्याला शिकवली आहे त्या त्रिसूत्रीचा अजिबात विसर पडता कामा नये;
पण अद्यापही गर्दीच्या ठिकाणी अनेक व्यक्ती दिसतात ज्यांनी मास्क परिधान केलेला नसतो किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क असतो तो पण फक्त नावाला, त्याचा कोणताही उपयोग या महामारीच्या कालावधीमध्ये होणार नाही. आता सर्वच ठिकाणी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होते की नाही, हा संशोधनाचा विषय आहे.
खरे तर जर सरकारी पातळीवर ओमायक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी बुस्टर तयारी केली जात असेल तर त्याच पद्धतीची तयारी सर्वसामान्य नागरिकांनीही करण्याची गरज आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना बेड उपलब्ध होत नव्हते. ही परिस्थिती लक्षात ठेवूनच अशा परिस्थिती पुन्हा येऊ नये अशी दक्षता सर्वसामान्य नागरिकांनाही घ्यावी लागणार आहे. या ओमायक्रॉन विषाणूचे ट्रेसिंग करणे सोपे असल्याने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची जर योग्य वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यामध्ये ओमायक्रॉनने बाधित असणाऱ्या नागरिकांना बाजूला काढले तरी संसर्गाची साखळी निर्माणच होणार नाही.