के. श्रीनिवासन
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या कार्यकाळाचे 200 दिवस पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचे विश्लेषण करण्याची ही चांगली संधी आहे.
एखाद्या राज्यात सत्तांत्तर झाल्यास सुरुवातीच्या काळात नव्या सरकारकडून कामकाजावरून खूप अंदाज बांधले जातात. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील यास अपवाद राहिले नाहीत. त्यांचे सरकार राजकीय व्यवहारचातुर्य, वैचारिक समतोलपणा आणि पूरक सार्वजनिक चेहरे लोकांसमोर आणण्यास यशस्वी ठरले. स्टॅलिननी आपला राजकीय मार्ग स्वत:च तयार केला आहे आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते कामकाजाच्या माध्यमातून प्रभावी ठरत आहेत. त्यांनी केवळ विरोधकांनाच बांधून ठेवले नाही
तर राष्ट्रीय पक्षांना देखील बाजूला ठेवण्यास यशस्वी ठरले. पक्षांतर्गत आणि सरकार अंतर्गत कलह होणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. म्हणजेच सहा-सात महिन्यांपासून तामिळनाडूत द्रमुकचे सरकार सक्षमपणे काम करत आहे. पक्षबांधणी आणि सरकारी आघाडीवर स्टॅलिन यांनी सर्वांनाच उत्तमरित्या मॅनेज केले आहे.
स्टॅलिन यांच्या काळात घेतलेले तीन वेगवेगळे निर्णय हे अगदी स्पष्ट आहेत. सर्वात अगोदर त्यांनी सर्व जातींच्या पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्याची परवानगी दिली. हा निर्णय द्रविड राजकारणाच्या दृष्टीने मोठा मानला जातो. कारण यासंदर्भात करुणानिधी यांनी अनेकदा भाष्य केले होते, परंतु ते निर्णय घेऊ शकले नाहीत. अर्थात हा निर्णय घेताना स्टॅलिन यांनी स्वत:ला माध्यमापासून दूर ठेवले. त्यांच्या संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना पुढे केले आणि त्याचा फारसा गाजावाजा केला नाही.
तसेच स्टॅलिन यांनी कोणाचेही मन न दुखवता आणि समाजस्वास्थ बिघडणार नाही, अशा रितीने नियोजन करत निर्णयाची अंमलबजावणी केली. त्याचवेळी त्यांनी अन्य जातींच्या लोकांनाही पूजेचा अधिकार मिळू शकतो, असा संदेश दिला. दुसरा निर्णय हा तमिळ भाषेची संस्कृती आणि महत्त्व जोपासण्यासाठी घेतला. जेव्हा राज्याचे गीत “तमिळ थाई वजथू’ म्हटले जाईल, तेव्हा सर्वांनी उभे राहून मातृभाषेचा सन्मान व्यक्त करावा, असा निर्णय घेतला. यासंदर्भात तमिळनाडू सरकारने विभागीय आदेशही जारी केला.
तत्पूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने याबाबत एक मत मांडले होते. न्यायालयाने म्हटले होते की, तमिळ थाई जेव्हा वाजवले जाते तेव्हा लोकांनी उभे राहण्याची गरज नाही. साहजिकच कट्टरपंथीयांना रोखण्यासाठी आणि तमिळ भाषेबद्दलची निष्ठा व्यक्त करण्यासाठी स्टॅलिन सरकारने निर्णय घेतला.
तिसरा निर्णय हा स्टॅलिन यांनी ईव्ही रामास्वामी नायकर यांची जयंती 17 सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय दिवस म्हणून जाहीर करणे होय. यानुसार राज्य सरकारने सर्व कार्यालय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक अधिकार दिवस साजरा करण्याचे बंधन घातले. हा निर्णय देखील द्रमुकच्या द्रविड विचारसरणीला पाठबळ देणारा आहे. एकूणातच स्टॅलिन हे मुरब्बीपणाने वाटचाल करत आहेत.
या निर्णयाने मूळ द्रविड विचारसरणी तर कायम राहील आणि ती केवळ कागदावरच राहणार नाही, याची काळजी स्टॅलिन यांनी घेतली. म्हणूनच करुणानिधी यांची कामकाजाची शैली काहीवेळा अतिरंजीत असायची, पण मुलगा कामकाजात उत्तम असून ते कोणतेही वाद निर्माण न करता निर्णय घेत आहेत.
स्टॅलिन यांच्याकडून जेव्हा विरोधकांवर हल्लाबोल होतो तेव्हा द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात राजकीय द्वि-ध्रुवीकरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यानुसार भाजपला कोणतीही संधी मिळू नये, असा प्रयत्न स्टॅलिन करतात. भाजपचे नेते देखील स्टॅलिन यांच्यावर आणि पक्षावर सातत्याने टीका करतात. परंतु स्टॅलिन मात्र त्यांना थेटपणे उत्तर देण्याचे टाळतात. यासाठी ते पक्षाच्या नेत्यांना किंवा प्रवक्त्यांना पुढे करतात. यादरम्यान त्यांनी केंद्र सरकार नाराज राहणार नाही, याचीही दक्षता घेतली. केंद्र सरकारशी त्यांनी शासकीय संबंध चांगले ठेवले आहेत.
विकास कामात संघर्ष हेणार नाही आणि निधीचा ओघ थांबणार नाही, यासाठी स्टॅलिन प्रयत्नशील असतात. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता केंद्र सरकारच्या नोकरशहांना पसंती दिली आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करत घटक पक्ष आणि त्यांच्या समर्थकांवर आपला प्रभाव ठेवला आहे. स्टॅलिन यांचे प्रशासकीय कामकाज देखील बऱ्याच अंशी
नोकरशहांच्या खांद्यावर आहे आणि आपली सार्वजनिक प्रतिमा चांगली राहण्यासाठी माध्यमांना खूश ठेवतात. सकाळी फिरताना किंवा आठवड्यातून एकदा सायकल चालवण्याच्या उपक्रमानिमित्त ते लोकांना भेटतात. आपल्या समर्थकांच्या दु:ख, सुखाच्या क्षणात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात.
करुणानिधी असेपर्यंत स्टॅलिन यांना राजकारणात फारसे महत्त्व दिले जात नव्हते. द्रविड विचारसरणीवर आधारित राजकारणातील प्रत्येक आघाड्यांवर करुणानिधी प्रभावी होते. सत्तेत असताना करुणानिधींनी प्रभावीपणे राज्य केले. विरोधकांसाठी कोणतीही त्रुटी ठेवत नसत. परंतु स्टॅलिन यांनी अगदी जमिनीस्तरापासून राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत वाटचाल सुरू केली. ते अनेक वर्षे युवा आघाडीचे नेतृत्व करत होते आणि ते प्रसिद्धी मिळवण्याच्या फंदातही पडत नव्हते.
अर्थात त्यांच्या या भूमिकेची खिल्लीही उडवली जायची. तत्कालिन काळात एक विनोद प्रचलित झाला होता. स्टॅलिन हे द्रमुकच्या युवा आघाडीचे प्रमुख म्हणूनच निवृत्त होतील, असे म्हटले जायचे. कारण 2018 रोजी करुणानिधी यांचे निधन होण्यापूर्वी स्टॅलिन हे सक्रिय होते आणि ते चेन्नई महानगरपालिकेचे महापौर देखील झाले. करुणानिधी यांच्या काळात ते दोनदा उपमुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी नेहमीच वडिलांच्या सावलीखाली वावरण्यात धन्यता मानली.
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक यांच्यातील अंतर्गत कलहाचा राजकीय लाभ स्टॅलिन यांना उचलता आला नाही आणि त्यादृष्टीने त्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांना एक कमकुवत नेते म्हणूनही मानले गेले. 2016 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत घटक पक्षाच्या मदतीने शंभरी गाठली, परंतु सत्तेत येऊ शकले नाहीत.
यासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरण्यात आले. परंतु स्टॅलिन यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पण आज मुख्यमंत्री बनल्यानंतरचा गेल्या 200 दिवसांतील त्यांचा कार्यकाळ चांगला राहिला आहे. परंतु जेव्हा सरकार शेवटच्या टप्प्यात येईल, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल, यात शंका नाही.