माहेरी राजकीय वातावरणात वाढूनही सासरी आल्यानंतर त्यापासून लांब राहून फक्त समाजकार्यातच स्वत:ला गुंतवून ठेवणे तसेच फार कठिण काम. पण ते लिलया पेलले ते कोटा ऍकॅडमीच्या संचालिका सौ. मंजिरी महेश खुस्पे यांनी. कोटा ऍकॅडमीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला मायेची सावली देण्याचा त्या गेली तेरा वर्षे प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ऍकॅडमीत दाखल झालेला विद्यार्थी त्यांना कधीही विसरत नाही. तेथील शिक्षण पूर्ण करूनही बाहेर अत्युच्च पदावर विराजमान झालेले विद्यार्थी आजही त्यांची भेट घेण्यासाठी येतात.
मंजिरी खुस्पे यांचे माहेर खटाव तालुक्यातील खातगुण. माहेरचे नाव सुनिता रामचंद्र लावंड-पाटील. कराडच्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महेश खुस्पे यांच्याशी 1994 साली त्यांचा विवाह झाला. लग्नापूर्वी त्यांचे एम. ए. पर्यंतचे शिक्षण झाले होते. पुढे शिकण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे भारती विद्यापीठात एम. बी. ए. चे शिक्षण घेतले. त्यावेळी महेश खुस्पे यांचा इलेक्ट्रीक व्यवसाय होता.
या व्यवसायातही सुरूवातीपासूनच मंजिरी या महेश खुस्पे यांना मदत करीत होत्या. त्यामुळे कोणतेही काम असो त्यांनी दोघांनी मिळूनच केल्याने प्रत्येक कामात यश येत गेले व काम करणेही सोपे झाले. त्यांची मुलगी मैथीली हिचे पाचवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या पुढील शिक्षणाचा विचार त्यांनी सुरू केला. अिायआयटी क्षेत्राबद्दल अगोदरच माहिती असल्याने त्याच क्षेत्रात मुलीला पाठविण्याचे त्यांनी ठरविले. महेश खुस्पे यांचे मित्र सौरभ मिश्रा हे कोटा राजस्थानला होते. त्यामुळे तिथेच मुलीला पाठवण्याचा खुस्पे दाम्पत्याचा विचार सुरू झाला. त्याबाबत मिश्रा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी इतक्या लहान वयात मुलीला लांब करण्यापेक्षा कोटालाच कराडमध्ये घेऊन जावा असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. यातूनच कराड येथे कोटा ऍकॅडमीची स्थापना झाली.
सन 2006 साली सौ. मंजिरी खुस्पे व महेश खुस्पे यांनी कोटा ऍकॅडमीची स्थापना केली खरी पण ही संकल्पना सुरूवातीच्या काळात आपल्याकडे रूजवणे त्यांना फार कठिण गेले. फक्त आपल्या मुलीच्या शिक्षणाचा विचार करून त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. त्यामुळे आज तेरा वर्षानंतर ही संस्था नंबर वनच्या पदावर पोहोचली आहे. आज या संस्थेतून अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मंजिरी या सतत पुढाकार घेतात.
ऍकॅडमीत फक्त पैशेवाल्यांच्या मुलांना प्रवेश असे न करता ग्रामीण भागातील मुले घडली पाहिजेत यासाठी त्यांना केंद्रित करून प्रवेश दिला जातो. तसेच पैसा मिळवणे हे ध्येय न ठेवता मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. त्यांना घडविण्यावर जास्तीत भर दिला जातो. तसेच मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी, सीबीएससी कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थी असला तरी त्याला एकाचप्रकारचे शिक्षण व वागणूक दिली जात असल्याने समानतेची भावना येथील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
फक्त एवढ्यावरच न थांबता लायन्स व लायनेस क्लबच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी त्या सतत पुढाकार घेतात. शहरात वृक्षारोपण, स्वच्छता अभियाना, अंगणवाडीतील मुलांना वजनकाटे, खाऊवाटप, अनाथआश्रमा मध्ये चटई, ड्रेस वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. प्रत्येक वर्षी 5 मुलांना कोटा ऍकॅडमीच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले जाते. यातून या दाम्पत्याची सामाजिक भावना लक्षात येते. आज शिक्षणाला खूप महत्त्व आले आहे. आजची पिढी शिकली तर उद्याचा सुजाण भारत निर्माण होऊ शकतो यासाठी आम्ही शिक्षणाला महत्त्व देत असल्याचे मंजिरी खुस्पे यांनी सांगितले.
आज शिक्षणाचे महत्त्व वाढू लागले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर तगडे विद्यार्थी तयार होणे गरजेचे आहे. मात्र कराडसारख्या भागात त्या पद्धतीचे शिक्षण नसल्याने तेथील मुले मागे पडतात. हा विचार करून महेश खुस्पे व मंजिरी खुस्पे यांनी केलेल्या कोटा ऍकॅडमीचे आज वटवृक्षात रूंपातर झाले आहे. संस्थेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज विविध पदावर कार्यरत आहेत हे संस्थेचे यश म्हणावे लागेल.