मेलबर्न – जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर येथे होत असलेल्या आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा वेळच विजेता ऑस्ट्रेलिया बाजी मारणार की, (वर्ष 1983 प्रमाणे) प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेला भारत आश्चर्यकारक कामगिरी करणार, याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया या सामन्यास थोड्याच वेळात मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.
Toss Update: #TeamIndia will bowl first against Australia in the #T20WorldCup final ?? #INDvAUS pic.twitter.com/tR5eC0MlsD
— BCCI Women (@BCCIWomen) March 8, 2020
दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग या दोघींनीही “आपलाच संघ चषक उंचावणार’ असा अत्मविश्वास व्यक्त केला असला तरी प्रत्यक्ष मैदानावर काय घडते, यालाच सर्वाधिक महत्त्व असेल.
गटसाखळीतील सर्वच्या सर्व चार सामने जिंकून भारत उपान्त्य फेरीत पोहोचला होता. तर ऑस्ट्रेलियाला गट साखळीत एकमेव पराभव पचवावा लागला होता आणि स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतानेच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. आता आज स्पर्धेतला अखेरचा सामना खेळताना, भारत पहिल्या सामन्यातील निकालाची पुनरावृत्ती करणार का, याची उत्सुकता क्रिकेटविश्वाला लागून राहिली आहे.