नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महिला राज पाहायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयात वैवाहिक वाद आणि जामीन प्रकरणांची सुनावणी फक्त महिला न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पार पडली. यासाठी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्या. हिमा कोहली आणि न्या. बेला एम त्रिवेदी यांचा समावेश असलेल्या सर्व महिला खंडपीठाची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सर्व महिला खंडपीठ स्थापन करण्याची ही तिसरी घटना आहे.
महिलांचे हे खंडपीठ वैवाहिक विवाद आणि जामीन हस्तांतरित प्रकरणांची सुनावणी करेल. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात ही तिसरी वेळ आहे. जेव्हा केवळ महिला न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. दोन्ही महिला न्यायमूर्तींच्या या खंडपीठावर सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या खोली क्रमांक 11 मध्ये सुनावणी सुरु आहे. केवळ महिला न्यायाधीशांच्या या खंडपीठासमोर 32 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. वैवाहिक विवादांच्या 10 हस्तांतरित प्रकरणांसह सुनावणी सुरु झाली, यानंतर जामीन आणि इतर 10 प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात 2013 पहिल्या महिला खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी न्यायमूर्ती ज्ञानसुधा मिश्रा आणि न्यायमूर्ती रंजना प्रकास देसाई यांच्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली. यानंतर 2018 मध्ये न्या. आर भानुमती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात सध्या तीन महिला न्यायाधीश आहेत. यामध्ये न्या. हिमा कोहली, न्या. बीव्ही नगररत्न आणि न्या. बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.
दरम्यान, कॉलेजियमच्या शिफारशींनुसार न्यायाधीशांच्या नियुक्त्या न करण्यावरून सर्वोच्च न्यायालय आणि सरकारमध्ये खडाजंगी सुरूच आहे. नियुक्तीच्या फायली रोखल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
न्या. नागरथना होणार पहिल्या महिला सीजेआय
न्यायमूर्ती बीव्ही नागरथना 2027मध्ये देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधिशासह 27 न्यायाधीश कार्यरत आहेत. ज्यात स्वीकृत पदांची संख्या ही 34 आहे. नागरथना सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश ईएस वेंकटरामय्या यांची मुलगी आहे. वेंकटरामय्या 19 जून 1989 ते 17 डिसेंबर 1989 पर्यंत देशाचे मुख्य न्यायाधीश होते.