आतापर्यंत आपल्याकडे कोणती साडी किती जुन्या काळापासून तयार होतेय हे आपण पाहत होता; पण महेश्वरी या साडीची निर्मिती त्यातल्या त्यात सर्वात अलीकडच्या काळात सुरू झाली असं म्हणता येईल.अठराव्या शतकात मध्यप्रदेशमधल्या इंदोरमध्ये मराठा राजे होळकरांचं राज्य होतं. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर या साम्राज्याची धुरा अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली; कारण त्यांचे पती, खंडेराव होळकर यांचा आधीच कुंभेरच्या लढाईत मृत्यू झाला होता.
अहिल्यादेवींनी आपली राजधानी इंदोरहून महेश्वरला हालवली आणि महेश्वरमध्ये अनेक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देऊन अनेक कलाकार, भाषातज्ज्ञ, पंडित, कवी, वास्तूतज्ज्ञ, विणकर आणि व्यापारी अशा अनेकांना तिथे बोलावून वसवलं. त्यांनी भारतभर शेकडो मंदिरं बांधली. एकदा महाराणींकडे कोणीतरी मोठे पाहुणे येणार होते त्यांना भेट देण्यासाठीची साडी अहिल्यादेवींनी स्वत: डिझाईन तयार करून, कापडाचा पोत, सूत वगैरे सगळं ठरवलं.सुरत आणि माळव्याहून विणकरांना बोलवून घेतलं; आणि ती साडी तयार होत असताना स्वत: जातीनं लक्ष घालून ती साडी विणून घेतली. ही साडी इतकी उत्कृष्ट झाली होती की अशाप्रकारच्या साड्या नंतर अहिल्यादेवींकडे आलेल्या पाहुणेमंडळींना भेट देण्याचा प्रघातच पडला. अथार्तच नंतर ही साडी महेश्वरी म्हणून ओळखली जायला लागली.
त्याकाळी ही साडी राजघराण्यातल्या स्त्रियांमध्ये फारच प्रसिद्ध होती. सुरुवातीला ही नऊवारी साडी रेशमामध्ये विणली जायची. नंतर गर्भरेशमात आणि आता सुती आणि लोकरीमध्येही विणतात. ही साडी वजनाला खूपच हलकी आणि भारतातल्या उष्ण हवामानाला साजेशी असते. पूर्वी ही साडी फक्त लाल, मरुन, काळा, जांभळा आणि हिरव्या अशा गडद रंगात तयार व्हायची. आता डाळिंबी, गुलबक्षी, जांभळा, तपकिरी, अंगुरी, आमर्क (सोनेरी), राणी, धानी अशा अनेक विशिष्ट रंगात ही साडी तयार होते. या साडीच्या वेगवेगळ्या नक्षीवरून तिचे वेगवेगळे प्रकार पडतात. काळ्या साडीवर चांदण्याची खडी असलेली चंद्रकळा, जांभळी म्हणजेच बैंगनी चंद्रकळा, सलग एक रंगी महेश्वरी, चंद्रतारा, चौकटींची चटाई साडी, आणि वेलबुट्टीची बेली-परबी असे एकापेक्षा एक मनमोहक प्रकार पहायला मिळतात.
महेश्वरीचं वैशिष्ट्य म्हणजे याचे काठ दोन्ही बाजूंनी सारखेच असतात त्यामुळे ही साडी दोन्ही बाजूंनी नेसता येते. ही साडी तयार करायची पद्धत मात्र नेहमीसारखीच आधी सूत रंगवून घेऊन नंतर ते विणतात. ही साडी विणताना त्यात सोन्या-चांदीची जर वापरली जाते.त्यामुळे या साडीला वेगळीच चमक असते. यासाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिच्या पदरावर दोन पांढरे आणि तीन इतर रंगातले आडवे पट्टे एक आड एक विणलेले असतात. या गोष्टीवरूनही ही साडी ओळखता येते.
पण इतक्या भरभराटीला आलेल्या या साडीचा हा व्यवसाय अहिल्यादेवींच्या मृत्यूनंतर म्हणजे 1895 नंतर ओहोटीला लागला. राजाश्रय मिळालेल्या या कलाकारांच्या डोक्यावरचं छत्र हरपल्यावर ते सैरभैर होऊन भारतात इतरत्र पसरले आणि या साडीची गुणवत्ता घसरायला लागली. नंतर ही ढासळलेली गुणवत्ता पुन्हा आणण्यासाठी आणि विखुरलेल्या विणकर कलाकारांना एकाच छताखाली आणण्यासाठी रिचर्ड आणि सॅली होळकर या अहिल्याबाईंच्या वंशजांनीच पुढाकार घेऊन 1978 साली रिवा नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन करून महेश्वरीची पुन्हा निर्मिती सुरू केली.
आता या रिवा मधून दर वर्षी दोन हजार महेश्वरी साड्या, चार हजार महेश्वरी स्टोल, दुपट्टे आणि रुमाल आणि सात हजार महेश्वरी ड्रेस मटेरिअल्स तयार होतात. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड जवळच्या चौंडी गावच्या पाटलाच्या मुलीनं एकोणतीस वर्षं राज्य संभाळून कलेलाही तितकाच मान असतो हे दाखवून दिलं. तिच्या कार्यामुळे अहिल्यादेवीचं नाव इतिहासामध्ये तर अमर झालं आहेच पण ते महेश्वरी साडीच्या रूपानं सर्वसामान्य स्त्रियांच्या मनात पुढच्या कित्येक पिढ्या दुमदुमत राहणार आहे.
अमृता देशपांडे