वैभवचं कुटुंब तसं छोटंच. आई, बायको प्रांजल, मुलगा मंगेश आणि कन्या अंकिता. पण आज घरात बरीच मंडळी जमली होती. शामल आत्या, अंजू मावशी, मामा-मामी, भावंडं या सगळ्यांनी घर कसं अगदी भरून गेलं होतं. हा म्हणजे कारण पण तसं खास होतं आणि ते म्हणजे अंकिताचं लग्न. लग्न पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं होतं पण अंकिता मात्र अजूनही कंपनीच्या कामानिमित्त अमेरिकेतच होती. त्यादिवशी मंगेशला फोन आला. “मंगेश, मी बोलतेय अंकिता. काय करतोस?’ “काही नाही. जस्ट डिनर झालं सगळ्यांचं. तुझाच विषय चालू होता.’ “कोण कोण आलय रे?’ “सगळे आलेत. तू सोडून. ये ना दीदी लवकर.’ “हो निघतेय उद्या. बर ऐक ना. लॅपटॉप चालू कर. मी इकडून व्हिडिओ कॉल करते. सगळ्यांना कधी पाहते असं झालय.’
मंगेशने लॅपटॉप ऑन केला आणि आवाज दिला. “सगळ्यांनी इकडे या. दीदीला बोलायचंय.’ सगळेजण घोळक्याने लॅपटॉप समोर उभे राहिले. अंकिताला पाहून सगळेजण खूप खूश झाले होते. “मावशी कशी आहेस? आणि अगं किती जाड झालीस?’ “मस्त आहे. होईल आता कमी. तुझ्या लग्नाची कामं काही कमी नाहीत. तू आलीस ना की समजेल तुला. अंकु बाळा, ये आता लवकर.’ “हो गं. मलाही असं वाटतंय कधी उद्याचा दिवस उजाडतोय. मी तुम्हा सगळ्यांसाठी काही तरी गिफ्ट्स घेतलीत. आले की देईल.’ आजीकडे हात करत, “माय ब्युटीक्वीन, लग्नात नाचायचंय म्हटल. तुला घेतलेली नववारी घालून अगदी ठसक्यात!’ तेवढ्यात अंकिताचे बाबा, “चला, म्हणजे माईचं गिफ्ट तर समजलं. आता आमचंच गुलदस्त्यात आहे म्हणायचं. अंकिता तूच आमचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस. कधी तुला पाहतोय असं वाटतंय.’ बराच वेळ सगळेजण अंकिताशी भरभरून बोलत होते. “बर चला. बॅग घेते भरायला. राहिलेलं तिथं आले की बोलते.’ असं म्हणून तासभर चालू असलेला गोंधळ एकदाचा थांबला.
“माई, बघितलं का काळ किती बदललाय! सातासमुद्रापलीकडे तुझी नात आणि तू इथे गावाकडे. पण असं वाटत होतं की जणू ती घरात समोर बसून बोलतेय आपल्याशी. शामल, आपण लहान असताना हे व्हॉट्सऍप, फेसबुक असायला हवं होतं. नाही का?’ “दादा, अरे घरात साधा मोबाइल तरी होता का त्यावेळेस? आप्पांनी रिटायरमेंटनंतर आलेल्या पैशातून लॅंडलाइन फोन बसवला होता. आपल्या गावात सगळ्यात पहिला फोन कुणाच्या घरात आला असेल तर तो आपल्याच! आणि त्याआधी तू शिकायला म्हणून पुण्यात असताना तुला आमची आणि आम्हाला तुझी खुशाली कळायची ती पत्रानेच.’ “हो ना. मला आजही आठवतं, होस्टेलला असताना लेटरबॉक्स मध्ये गावाकडून आलेलं पत्र पाहिलं की, असं वाटायचं कधी एकदाचं ते टपाल फोडून वाचायला घेतो! तुला सांगतो, पत्राचा साधा वास जरी घेतला तरी गावाकडच्या आठवणीनं भरून यायचं! पत्रातली पहिली ओळ “चिरंजीव वैभव यास शुभ आशीर्वाद…’ वाचली की, डोळ्यासमोर आराम खुर्चीत बसून पत्र लिहिणारे आप्पा आणि शेजारी उभी असलेली माई दिसायची. पत्रातील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा जाणवायचा. असं वाटायचं जणू मायेनं एक एक शब्दाची गुंफणच केली आहे! पत्रातल्या दोन ओळीतही मन रमायचं. ते इतकं की क्षणात मी गावी पोचल्यासारखं वाटायचं.’
“दादा, त्या दोन ओळीतल्या शब्दात खूप दाटी असायची लिहिताना. का तर, प्रत्येकालाच वाटायचं मलाही लिहायला मिळावं आणि हितगुज करता यावं.’ “हो. ते दाटलेले शब्द नात्याची वीण घट्ट करत राहिले आणि आपल्यातलं अंतर कमी! प्रांजल, तुला आठवतंय लग्न जमल्यानंतर तुला मी पहिल्यांदा पत्र पाठवलं होतं.’ “हो आठवतंय. नेमकं पोस्टमनने ते आबांच्या हातात दिलं. बिचारा उन्हानं घामाघूम झाला होता म्हणून आबांनी त्याला आत बोलावून पाणी दिलं. पण मला इकडे घाम फुटला होता. मी चांगलीच घाबरले होते! पण उलट आबा हसत म्हणाले, “जावयाला सांगा पुढच्या महिन्यात आम्ही पण फोन बसवून घेऊ. म्हणजे तुमचा लिहायचा त्रास वाचेल.’ तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला.’
तेवढ्यात मंगेशने हातातल्या मोबाइलवरून नजर वर करत मिश्कीलपणे विचारलं, “म्हणजे ममा तुम्ही पण एकमेकांना लव्हलेटर लिहायचा? तुमच्या काळात..?’ “गधड्या, माईसमोर काय लव्हलेटर म्हणून विचारतोस? पत्र म्हणजे आमच्यासाठी दूर असलेली दोन मनं जवळ आणणारा असा एक दुवा होता जो तुमच्या पिढीला नाही कळणार. तुझ्या बाबानी तर एकदा पाकिटात पत्राबरोबर अंगणातल्या पारिजातकाची काही फुलं पण दिली होती पाठवून! टपाल हातात पडलं तेव्हा पार सुकून गेली होती.’ हे ऐकून सगळेजण जोरजोराने हसू लागले.
मंगेशचे बाबा उठून अलमारीजवळ गेले. हातात एक पत्र घेतलं आणि माईजवळ येऊन बसले. “माई, आप्पांच हे शेवटचं पत्र. “माईला आणि शामलला अंतर देऊ नकोस.’ असं लिहिलं होतं. हे फक्त पत्र नव्हतं तर त्या चार ओळीत माझ्याकडून घेतलेलं वचन होतं. आज हे सगळं बघायला आप्पा हवे होते.’ क्षणभर सगळे हळवे झाले. माईने वैभवच्या डोक्यावरून हात फिरवला, “माझी नात हा उंबरठा ओलांडून निघून जाईल. पण मनाने ती कायमच आपल्याशी जोडली असेल. पत्राने नाही पण त्यांच्या बदलेल्या पद्धतीने का होईना ती आपल्याशी भेटत राहील.’ “आजी एकदम बरोबर. आत्ता एक सेल्फी घेतो आणि दीदीला सेंड करतो. स्माइल प्लीज.’ असं म्हणताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मंगेशने आपल्या कॅमेऱ्यात टिपलं.
हे अगदी खरंय. काळानुसार झालेला बदल स्वीकारलाच पाहिजे. पत्रातल्या शब्दांची जागा मोबाइलमधल्या सेल्फीने घेतली तरी नात्यातले ऋणानुबंध तेव्हाच टिकून राहतात जेव्हा समोरच्याने व्यक्त केलेलं भाव वाचता येतात. मग ते मोबाइलमधल्या फोटोतले असो वा पत्रामधल्या शब्दातले…!
अमोल भालेराव