संध्याकाळी मुलांचा खेळ अगदी रंगात आला होता. सोसायटीच्या मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत रोज संध्याकाळी मुलांचा खेळ रंगतो. प्राथमिक शाळेत जाणारी-इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातील मुले तेथे खेळतात. मोठ्या मुलांना मात्र क्रिकेटसारखे खेळ खेळायला ती जागा पुरत नाही. ती बाहेर खेळायला जातात. या मुलांना मात्र खेळायला ती जागा पुरत असल्यामुळे तेथे त्यांचे नेहमी वेगवेगळे खेळ चालतात आणि खेळात चिवचिवाटही भरपूर चालतो.
आज मी मंदिरात गेले तर 10-12 मुले वर्तुळ करून बसली होती आणि एक मुलगा त्यांच्या भोवती हातात एक रूमाल घेऊन फेऱ्या मारत होता. फिरता फिरता म्हणत होता “मामाचं पत्र हरवलं’ आणि बसलेली मुले एका सुरात म्हणत होती “ते मला सापडलं’ त्यांचा तो खेळ तेथे उभी राहून मी बघू लागले. फेऱ्या मारणाऱ्या मुलाने हातातील रूमाल एका मुलाच्या पाठीमागे हळूच टाकला आणि तो “मामाचं पत्र हरवलं’ म्हणत तसाच पुढे गेला. आपली फेरी पूर्ण करून तो रुमाल टाकलेल्या मुलाजवळ आला आणि रूमाल उचलून त्याने रुमालानेच त्या मुलाच्या पाठीवर त्याने मारायला सुरुवात केली. अर्थात ते मारणे काही जोरात नव्हते. गमतीने मारल्यासारखे होते, पहिला फटका बसताच तो मुलगा ताडकन उठला आणि त्याने पळायला सुरुवात केली. बाकीची मुले टाळ्या वाजवू लागली. फेरी मारून मूळ जागी येताच तो मुलगा जागेवर बसला आणि खेळ पुढे सुरू झाला. ज्याच्या मागे रुमाल टाकला आहे त्याने रूमाल टाकलेले ओळखले की त्याने मागचा रुमाल उचलून रुमाल टाकणाऱ्या मुलाला मारत मारत पळवायचे. तो आपल्या जागेवर बसेपर्यंत.
मला आठवले, आमच्या लहानपणीही हाच खेळ खेळला जात होता, फक्त “मामाचे पत्र हरवले’ ऐवजी आम्ही “आईचा रूमाल हरवला’ म्हणायचो, आणि बसलेली मुले “तो मला सापडला’ म्हणायची. त्या मुलांचे मामाचे पत्र हरवले ऐकून माझ्या मनात विचार आला, आताच्या काळात केवळ मामाचेच नाही, तर सारीच पत्रे हरवली आहेत. पूर्वी पत्राची वाट किती आतुरतेने आम्ही पाहायचो. आजकालच्या मुलांना तर पत्र आणि पोस्टमन या दोन्ही गोष्टी फारशा परिचित नाहीत. त्यांच्या हाती मोबाइल असतो. या मोबाइल-इंटरनेटच्या जमान्यात पोस्ट खाते फार मागे पडले आहे. पत्र, इग्लंड, पाकीट, मनिऑर्डर, पार्सल… अशा अनेक गोष्टी पोस्टापासून दूर गेल्या आहेत. त्यांची जागा मोबाइल, इंटरनेट, कुरियर यांनी घेतली आहे.
तेव्हा मामाचे पत्र हरवले हे खरे असले, तरी ते मला सापडले हे मात्र खरे नाही. मला स्वत:ला कोणाचे तरी पत्र येऊन चारदोन वर्षे झाली असतील. पूर्वी लग्नाच्या मोसमात डझनानी येणाऱ्या लग्नपत्रिका आता व्हॉट्सऍपवर येऊ लागल्या आहेत. पोहचल्यावर पत्र पाठव बरं का! असे आता कोणी काळजीने सांगत नाही. आता निघाल्यापासून पोहचेपर्यंत क्रिकेटच्या रनिंग कॉमेंट्रीप्रमाणे कुठवर पोहचलो, प्रवास कसा चालला आहे वगैरे माहिती दिली जाते. बिचाऱ्या पोस्टमनचे कामच कमी झाले आहे. पूर्वी पोस्टमनची आतुरतेने वाट पाहिली जायची. आता पत्रव्यवहारच संपलेला आहे, तर पोस्टमनची वाट पाहणे कुठले? मामाचे पत्र खरोखरच हरवले आहे.
अश्विनी महामुनी