मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत असून यामुळे भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली आहे. यावरून आता राजकारण तापलं आहे.
या निलंबनाची तक्रार करण्यासाठी भाजपचे 12 आमदार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं समजतं. त्याचवेळी आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी पाठविलेल्या १२ नावांची यादी चर्चेत आली आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठीची नावे भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे वर्षभरापूर्वी पाठवली आहे. मात्र राज्यपाल कोश्यारींकडून अद्याप या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वादही झाला होता. एवढच नाही तर हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे.
दरम्यान विधान परिषदेच्या बारा जागांवर राज्यपाल काय निर्णय घेणार, याची प्रतीक्षा असतानाच भाजपचे १२ आमदार विधानसभा तालिका अध्यक्षांनी निलंबित केले आहेत. या कारवाईतून महाविकास आघाडीने हिशोब बरोबर केला का, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.