काबूल – काबूल येथील भारतीय राजदूत कार्यालयातील महात्मा गांधींचे म्युरल (भित्तिशिल्प) पुन्हा एकदा शांततेचा शक्तिशाली संदेश देण्यासाठी सज्ज झाले आहे. वर्ष 2017 मधील मे महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हे शिल्प नष्ट करण्यात आले होते. त्या हल्ल्यात 140 जणांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानच्या कलाकारांचा गट आर्टलॉर्डस् बापूंच्या 150 व्या जयंतीपूर्वी ते पुन्हा साकारले आहे. त्यावर महात्मा गांधी यांनी दिलेला संदेश इंग्लिश तसेच पर्शियन भाषेत रेखाटण्यात आला आहे. प्रेमाच्या शक्तीचे सत्तेवर अधिपत्य होईल. त्यादिवशी जग शांततेला चांगल्या प्रकारे समजू शकेल, अशा आशयाचे संदेश त्यातून दिला आहे. सात कलाकारांनी 325 चौरस फूट आकारातील हा शिल्प संदेश प्रत्यक्षात आणला आहे.
आर्टलॉर्डस प्रमुख ओमैद फरिदी म्हणाले की, महात्मा गांधींना यापेक्षा वेगळी श्रद्धांजली दिली जाऊ शकत नाही. अफगाणिस्तानातील लोकांची गांधीजींच्या शांती, अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा आहे. शांतीसाठी लढणारा व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. ही ओळख येथे कायम ठेवणे गरजेचे होते. आमची ही संस्था अफगाणिस्तानातील शिक्षण प्रणालीस कला-संस्कृती जोडण्याची समर्थक आहे. त्यामुळेच जगभरातून महिला कलाकारांचा संपर्क व संवाद वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करते.