मुंबई – महात्मा गांधी आणि त्यांच्या वडिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद काल राज्याच्या अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. आता या सर्व प्रकारावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्तव्य संभाजी भिडे यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमात केले. यानंतर त्यांच्यावर एकच टीकेची झोड उठली. आता तुषार गांधी यांनी देखील भिडेंच्या टीकेबाबत वक्तव्य केलं आहे.
“संभाजी भिडे जे बोलले, ते इतकं घृणास्पद नव्हतं पण त्यांच्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांनी हसून त्या विधानाचं समर्थन करणं घृणास्पद होतं” असं स्पष्ट मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तुषार गांधी यांनी भिडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
तुषार गांधी पुढे म्हणाले,“या राज्याच्या मानसिकतेची विकृतता किती झालीये याचं हे उदाहरण आहे. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी होती. पण तिथे नारीशक्ती इतकी लुप्त कशी झाली की एका आईचा इतका मोठा अपमान केला जात असताना महाराष्ट्रात एकही महिला याविरोधात आवाज उठवत नाही, एकाही महिलेला स्वत:चा अपमान होतोय असं वाटत नाही. ही चिंतेची गोष्ट आहे असंही गांधी यावेळी म्हणाले.
हे एका कुटुंबापुरतं मर्यादित नाहीये, असं म्हणत तुषार गांधींनी भिडेंच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. बापूंना बदनाम करण्याचं कारस्थान नागपूरहून चालवलं जात अशी टीका देखील यावेळी तुषार गांधी यांनी आरएसएसवर केली. यावेळी बोलताना ते चांगलेच भावूक देखील झाले होते.
काय म्हणाले होते भिडे नेमकं
संभाजी भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.