रहिमतपूर – तारगाव (ता. कोरेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत फक्त दोन दिवस झालेल्या पावसाने पडली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. परंतु, या भिंतीचे बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांत आलेल्या पावसामुळे भिंत पडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच उर्वरित राहिलेली अर्धी भिंत पडण्याच्या अवस्थेत असून त्यालाही मोठ्या चिरा गेलेल्या आहेत. या शाळेत लहान मुलांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या भिंतीलाही तडे गेले असून ते सुद्धा एका बाजूला कलले आहे. या भिंतीचे बांधकाम एका ठेकेदाराने घेतले होते. परंतु, संबंधित ठेकेदारांनी स्वतः काम पूर्ण न करता गावात राहणाऱ्या एका ठेकेदाराकडून हे बांधकाम पूर्ण करून घेतले असल्याची माहिती आहे.
निकृष्ट बांधकामामुळे पडलेल्या भिंतीची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून ठेकेदाराला शासनाच्या काळ्या यादी टाकण्यात यावी, अशी मागणी तारगाव ग्रामस्थांनी केली आहे. ग्राम विकास अधिकारी निलेश बर्गे व सरपंच सौ. अलका निकम यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.