मुंबई : एकापाठोपाठ झालेल्या भीषण अपघातांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. सोलापूरमध्ये पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. तर बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. त्यासोबतच परभणीच्या चारठाणा परिसरात एकाच दुचाकीवरुन पाचजणांना प्रवास करणे त्यांच्या जीवावर बेतले आहे.
बुलढाण्यात दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला असल्याचे माहिती समोर आली आहे. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. यात शेगावला देवदर्शनासाठी जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींवर देऊळगाव राजा आणि जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
सोलापुरात वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्व प्रवासी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील रहिवासी असून एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली.. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावजवळ हा अपघात झाला.
परभणीच्या चारठाणा परिसरात एकाच दुचाकीवरुन पाच जणांना प्रवास करणे त्यांच्या जीवावर बेतले आहे. या दुचाकीचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अतिक तांबटकरी, शेख अमीर आणि शेख मोबीन अशी मृतांची नावं आहेत. वसिम खय्युम, विखार रसिक हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे पाचही जण एकाच दुचाकीवरुन प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीची आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.