वडापुरी -ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात अडचणीतील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन थकबाकीचे कारण पुढे करून तोडले जात आहे. त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाल्यानंतर कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज करून त्या थकबाकीचे हप्ते पाडून घेतल्यास त्याचे कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली; मात्र अधिकाऱ्यांपर्यंत लेखी आदेश आलेच नाहीत. त्यामुळे सप्टेंबर 2020 नंतरची संपूर्ण रक्कम न भरलेल्यांची वीज तोडण्याची कारवाई सुरूच आहे.
मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी अवकाळी, अतिवृष्टी आणि करोना या संकटांचा सामना करतानाच राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. तरीही, वीजेची थकबाकी भरली नाही म्हणून त्यांचे कनेक्शन तोडले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेकांनी वीज तोडणीबद्दल अधिवेशनात आवाज उठविला.
इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रस्ता रोको आंदोलन केले. ज्यांना संपूर्ण वीजबिल एकरकमी भरणे अशक्य आहे, त्या शेतकऱ्यांना हप्ते पाडून देऊन कारवाई थांबविली जात असल्याची माहिती उर्जामंत्र्यांनी दिली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.