मुंबई – गाडी चालवत असताना नियमांचे उल्लंघन केले तर आता तुम्हाला भला मोठा दंड द्यावा लागणार आहे. कारण राज्य परिवहन विभागाने वाहतूकीच्या नियमांचा भंग केल्यास मोठा दंड आकारण्याची तयारी सुरू केलीय. नवीन दंडाची नियमावली तयार करण्यात आली असून ती सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलीय.
कोणते नियम मोडल्यास किती दंड?
1) बेस्ट बसमधून विना तिकीट प्रवास केल्यास 1200 रूपये दंडाची तरतूद नव्या प्रस्तावात केली गेली आहे.
2) गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्यास 2000 रूपयांचा दंड.
3) गाडी चालवत असताना सोबत गाडीची कागदपत्रे नसल्यास 200 ते 300 रूपये दंड.
4) लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रूपये दंड.
5) गाडीची पीयूसी नसल्यास 2000 रूपये दंड.
6) निशिद्ध क्षेत्रात प्रवेश केल्यास 5000 रूपये दंड.
7) गाडी चालवत असताना मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर सुरू ठेवल्यास देखील आता दंड आकारला जाणार आहे.
8) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, सिग्नलचे नियम मोडणे, अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविणे अशा अनेक गोष्टींचाही नवीन वाहतूक नियमात दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य परिवहन विभागाने तयार केलेल्या नवीन दंडाच्या नियमावलीत जवळपास 150 गोष्टींचा समावेश केला आहे. त्यामुळे आता वाहन चालवत असताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नव्या नियमावलीच्या प्रस्तावास राज्य सरकारकडून मंजूरी मिळाल्यास राज्यात नवीन वाहतूक दंड प्रणाली लागू होणार आहे.