-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा प्रारंभ
मुंबई: 2014 पूर्वीच्या पाच वर्षात एकूणच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची पिझेहाट होत होती. पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र हा कधी चौथ्या तर कधी पाचव्या क्रमांकावर तर कधी सहाव्या क्रमांकावर जात होता, पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक राज्य म्हणून आपला पहिला क्रमांक पुन्हा मिळवला आहे. देशातल्या औद्योगिक गुंतवणुकीत तसेच देशातल्या थेट विदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
राज्यातील स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी व रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ कार्यक्रम ही महत्वाकांक्षी योजना आखली आहे. वरळी येथील एनएससीआयच्या डोममध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. या प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग सचिव डॉं. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेच्या व वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीत जर गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पाहिली तर चार राज्यांमधील एकत्रित गुंतवणूकीपेक्षा या पेक्षादेखील जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत आहे. हे महाराष्ट्राचे महत्वाचे यश आहे. निती आयोग व रिझर्व्हॅं बॅंकेने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पहिला क्रमांकावर महाराष्ट्राच आहे. राज्यात मागील पाच वर्षात राज्यात 59 लाख 42 हजार रोजगार निर्मिती झाली. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या योजनेसाठी 500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. पुढच्या वर्षी एक- दोन हजार कोटी रुपये देण्यसाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही असेही फडणवीस यांनी आवर्जुन सांगितले.