पुणे – गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे ओढे, नोले आणि नद्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी पीके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे विदर्भासह मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वदूर पाऊस होत असताना मराठवाडा मात्र कोरडा होता. त्यामुळे या भागात दुष्काळी परिस्थिती होती. या परिसरातील खरीप सुद्धा वाया जाण्याची शक्यता असताना गेल्या आठवड्यापासून मराठवाड्यात चांगला पाऊस सुरू आहे. नांदेड, परभणी जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस आहे. नांदेड जिल्ह्यातील 4 तर परभणी जिल्ह्यातील 7 आणि हिंगोली जिल्ह्यातील 2 मंडळांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्याचबरोबर सेनगाव येथे 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवास
देशातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पुढील आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. दरवर्षी साधारणपणे 1 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.