नांदेड :- देशासह राज्यातील राजकारणाची पातळी खूपच खालच्या स्तरावर गेली आहे. सध्या आयपीएलप्रमाणे राजकारण्यांचे लिलाव होत असून नेते इकडून तिकडे जात आहेत, असा टोला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी लगाविला.
तसेच अपात्रतेच्या कायद्याची पायमल्ली होत आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशोक चव्हाण म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार देण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी अजित पवार यांच्यावर निधी देत नसल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी शिवसेनेत बंड केले होते. पण, पुन्हा अजित पवारांकडे अर्थखाते आल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते.
जे आमदार अजित पवार यांच्यामुळे सोडून गेले. तेच अजित पवार आता पुन्हा अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यास हरकत नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.