मुंबई – राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, अद्याप विरोधी पक्षनेता कोण? यावर मविआतील घटकपक्षांचे एकमत झाल्याचे दिसत नाही. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच याबाबत बोलताना अजूनतरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत काहीही चर्चा झालेली नाही. मात्र, पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे.
विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हेच सत्ताधारी पक्षात गेल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेते पद रिकामे आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्याबळानुसार कॉंग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहेत.
चव्हाण यांनीही आज पत्रकारांशी बोलताना संख्याबळानुसार कॉंग्रेसला हे पद मिळायला हवे, असे मत व्यक्त केले. तसेच, लवकरच याबाबत मविआची बैठक होईल. त्यात यावर निर्णय घेण्यात येईल, अशी आशाही चव्हाणांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
दरम्यान, विरोधी पक्षनेता जाहीर करण्यासाठी विरोधकांकडे बहुमत राहणार नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की, 2024 चे निकाल आल्यानंतर ठाकरे गटाचे काही लोक नक्की नागपुरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल होतील.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अमोल मिटकरी जोरात कामाला लागले आहेत. विरोधकांनी काळजी करू नये. राज्याच्या विकासावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले असल्याने कुणीही नाराज, अस्वस्थ नाही. सर्व 26 मंत्री योग्य पद्धतीने काम करतील आणि सर्व आमदारांचे त्यांना सहकार्य असेल.
सर्व मंत्र्यांना समन्वयाने खातेवाटप झाले आहे. कुठले खाते जास्त महत्त्वाचे किंवा कमी महत्त्वाचे नसते. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे मंत्री मिळालेल्या खात्यांमार्फत महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा देतील, असेही ते म्हणाले.