मुंबई :- “मनसेप्रमुख राज ठाकरे हे आमच्यासोबत येणार नसतील तर आम्ही काय त्यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवून बसलो आहोत का? ते आमच्यासोबत येणार नाही, याचा आनंद आहे. त्यांनी आयुष्यभर आमच्यासोबत येऊ नये, अशी सदिच्छाही आहे,’ असा खोचक टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. तुम्ही भाजपशी युती करणार का, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी कोणालाही भेटले की युती होत नसते. प्रसारमाध्यमां- कडून याची चर्चा केली जात असली तरी या सगळ्याचा आम्हा नेत्यांशी काहीही संबंध नसतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींविषयी भाष्य केले होते. भाजपने अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. आम्ही त्यांना जेलमध्ये टाकणार, असे भाजपचे नेते म्हणत होते आणि नंतर त्यांच्यासोबतच युती केली. यानंतरही लोक त्यांनाच मतदान करणार असतील तर तुम्हाला असेच सत्ताधारी मिळणार, असेही ते यावेळी म्हणाले होते.
पवारांचे राजकारण पाहत आलोय….
जसा समाज असतो, तसं सरकार तुम्हाला मिळते. अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यावेळी मी पहिल्या तासाभरातच ट्विट केलं होते की, राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली टीम रवाना झाली. सगळे तसंच होतंय की नाही? अजूनही अजित पवार आणि शरद पवार यांचे फोटो एकाच बॅनरवर लागत आहेत. मी गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांचे हे राजकारण बघत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.