औरंगाबाद – मंगळवारी (दि. 20) राज्यातील ग्रामपंयाचत निवडणुकीचे निकाल समोर आले. त्यानंतर विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या वादाच्या घटना समोर आल्या होत्या. काही ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याचेही समोर आले होते. अशातच आता औरंगाबाद येथील करोडी गावातील विजयी उमेदवाराच्या सासऱ्यांच्या शेतातील पपईची बाग भुईसपाट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ धोंडिबा दवंडे यांची करोडी शिवारात गट क्रमांक 85 मध्ये 7 एकर जमीन आहे. त्यापैकी एक एकर जमीनीत त्यांनी पपईची बाग लावली होती. 700 पपईची झाडे लावली होती. त्यांना चांगला माल लागला होता. मात्र ग्रामपंचायत निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अज्ञातांनी त्यांची 300 हून अधिक पपईची झाडे कापली आहेत.
सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार दवंडे यांच्या लक्षात आला. दवंडे यांच्या सुनबाई सोनाली दवंडे या वाॅर्ड क्रमांक 1 मधून ग्रामपंचायत निवडणुक लढवत होत्या. त्यांचा विजय झाला आहे. विरोधकांना विजय सहन न झाल्याने त्यांनीच हे कृत्य केले असावे असे दवंडे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.