Maharashtra Lok Sabha – लोकसभा निवडणूक तारखांची शनिवारी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि मविआत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीत आता मनसेला सहभागी करून घेतल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे जागावाटपावरून महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडी बाहेर पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
राज्यात भाजपने पहिली यादी जाहीर केली असून मनसेला सहभागी करुन घेत पुढची यादी लवकरच प्रसिद्ध होईल. तर महाविकास आघाडीची जागा वाटपाची महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडत आहेत. 2019 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेला विरोध यंदा त्यांच्या भाषणात कुठेही दिसत नाही. याशिवाय उद्धव ठाकरे सोबत नसल्यामुळे ‘ठाकरे’ नावाचे मॅजेक आणि मराठी मॅग्नेट दुरावल्याचीही उणिव भाजप नेत्यांना सतावत आहे.
राज ठाकरे महायुतीत आल्यास ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्यासोबत राहिल आणि याचा लोकसभेसोबतच विधानसभा आणि आगामी मुंबईसह राज्यातील विविध महापालिका निवडणुकीतही फायदा होईल, हा दूरचा विचारही भाजप नेतृत्वाने केलेला दिसत आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग आहे की नाही, हे कोडे त्यांची एक्झिट होण्याची वेळ आली तरी सुटलेले नाही. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मविआकडे सुरुवातीला 27 जागांची मागणी केली. त्यानंतर ते आता सहा जागांवर आले असल्याचे म्हटले जाते. तर मविआ त्यांना चार जागा देण्याची तयारी ठेवून आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद लोकसभेवर दावा केला आहे. ही जागा आम्ही जिंकली आहे, त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आघाडी नाही झाली तर 48 जागा लढवण्याचीही आमची तयारी असल्याचेही ते म्हणाले.