मुंबई :- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबध्द प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे 7 हजार 554 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे 2 हजार 230 इतकी आहेत. बँकेने मंजूर केलेली प्रकरणे 235 इतकी आहेत. आतापर्यंत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत मिळालेले रु.६५ कोटी इतके अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. तरी सुध्दा ‘एक जिल्हा, एक उत्पादन‘ अंतर्गत निवडलेली उत्पादने तसेच जी.आय. मानांकन मिळालेल्या पिके व उत्पादनांची मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे, असेही कृषी मंत्री भुसे यांनी सांगितले.