कराड -करोनाचे महाराष्ट्रावर मोठे संकट असतानाही इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. राज्याच्या हक्काचा निधीही दिला जात नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी निधी मिळत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. ना. शंभूराज देसाई म्हणाले, कराड शहरातील एन्ट्री पॉईंट व कटेनमेंट झोनची पाहणी केली. मालखेड फाटा येथे जिल्हा चेकपॉईटलाही भेट देऊन पाहणी केली आहे. याठिकाणी 24 तास पोलीस यंत्रणा काम करत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करावयाच्या आहेत, त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. तसेच पाटण, सातारा, कराडची मी स्वतः पाहणी केली आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच प्रशासनाने आवाहन करण्यापूर्वीच नागरिक घराबाहेर पडले नाहीत. करोनाचा संसर्ग रोखण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. लॉकडाऊन यशस्वीपणे पाळला गेला तर काही प्रमाणात करोनाला रोखण्यात यश मिळेल.
यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून करोनाच्या संकटात केंद्र सरकार राज्याला अपेक्षित सहकार्य करत नाही. महाराष्ट्रावर मोठे संकट असताना राज्याच्या हक्काचा निधीही दिला जात नसल्याचा गंभीर आरोप ना. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.