कराड -लॉकडाऊनच्या काळात दूधाच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा काळात खाजगी व सहकारी दूध संघाकडून अत्यल्प दराने दूध खरेदी केली जात आहे. अशा स्थितीत दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने दि. 1 ऑगस्टला राज्यभरात दूध एल्गार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे भाजपच्यावतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बॅंकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळाबाजार या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झालेला नाही.
लॉकडाऊनच्या काळात दूधाच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. सध्या ज्या दराने दूध खरेदी केले जाते, त्यातून दूधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दूध 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात केवळ 7 लाख लिटर दूधच खरेदी करण्यात आले आहे. त्यात पुन्हा मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडूनच शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना मात्र शासनाने वाऱ्यावर सोडले आहे.
म्हणूनच गायीच्या दूधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान, दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान आणि शासनाकडून प्रतिलिटर 30 रुपये दराने दूधाची खरेदी करावी, अशी मागणी भाजपाच्यावतीने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे अध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, उत्तरचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.