मुंबई – राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने आज (शुक्रवारी) २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पायावर व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. अशातच आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी पत्रकारपरिषद घेण्यास केलेल्या घाईवर सडकून टीका केली आहे.
फडणवीस यांच्या पत्रकारपरिषदेवेळी सभागृहाच्या आवारातील इंटरनेट बंद पडलं होत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब लक्षात आणून देत थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. इंटरनेट बंद पडणे योगायोग आहे की ते सरकारतर्फे बंद पाडण्यात आलंय असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. यावेळी फडणवीस यांच्या समवेत असलेल्या भाजप नेत्यांनी ‘इंटरनेट बंद पडणाऱ्या ठाकरे सरकारचा…’ अशीही घोषणाबाजी केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केलंय
कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केलाय त्यानं काय होणार नाही. या सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केलंय. महाराष्ट्राच्या सर्व घटकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारनं केलंय, हे बजेट महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार काम होऊ शकत नाही वृत्तपत्रात चौकट येतील, चार बातम्या होऊ शकतात.
समृद्धी महामार्गला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा विरोध होता
आमच्या काळात सुरु असलेल्या योजना या बजेटमध्ये पुन्हा सांगायच्या. आमच्या योजना बंद करणाऱ्या सरकारनं पुन्हा त्या सुरु केल्या. समृद्धी महामार्गला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा विरोध होता.
कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळालं नाही
शेतकऱ्यांना या बजेटनं काय दिलं नाही दोन वर्षापूर्वी जी घोषणा करण्यात आली होती ती 50 हजार रुपयांचं अनुदान जाहीर आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देतोय सांगतायत. कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळालं नाही.
राज्याचं सरकार कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटून घेतंय?
करोना काळात सर्वाधिक रुग्ण मृत्यूमुखी पडलेल्या राज्याचं सरकार कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटून घेतंय? काही योजना सोडल्या तर समाजातील कोणत्याही घटकांना दिलासा मिळालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन मोर्चा काढणार का?
पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी फुटकी कवडी देण्यात आली नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन मोर्चा काढणार का?
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बजेटमध्ये दिसत नाही
मराठवाडा ग्रीडला निधी देण्यात आलेला नाही, दुष्काळमुक्तीसाठी निधी देण्यात आलेलं नाही विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बजेटमध्ये दिसत नाही. काही मतदारासंघाचं सरकार, काही लोकांचं सरकार. केंद्र सरकारच्या योजना घोषित करण्यात आलेल्या आहेत. या बजेटनं सामान्य माणसाची निराशा.