Shinde group । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यात सर्वात मोठा फटका हा शिंदे गटाला बसला आहे. कारण हिंगोली लोकसभा मतदार संघात शिंदेसेनेवर अखेर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यासोबतच यवतमाळमधून भावना गवळी यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिकच्या हेमंत गोडसे आणि हातकणंगल्याच्या धैर्यशील मानेंचं यांच्याविषयी नेमका निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता हदगाव तालुक्यातील कोहळी येथील बाबुराव उर्फ संभाराव गुणाजी कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हदगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन्ही वेळा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. तर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट झालेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 मार्च रोजी त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामधील हेमंत पाटील आणि भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा असलेला विरोध लक्षात घेता त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे.
हेमंत पाटील आणि धैर्यशील मानेंना विरोध Shinde group ।
जाहीर करण्यात आलेल्या आठपैकी सात खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती. त्यामध्ये रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी या आधीच कापण्यात आली आहे. तर लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाचा संदर्भ देत हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकणंगल्यातील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता.
निवेदिता माने आणि राजश्री पाटलांना संधी Shinde group ।
धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट आपोआप कापण्यात आलंय.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आले होते. त्यामधीलच भावना गवळी, हेमंत पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. तर धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे.
हेमंत गोडसेंना संधी नाहीच?
भावना गवळींचं तिकीट कापल्यानतंर आता नाशिकच्या हेमंत गोडसेंचंही तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल अशी माहिती आहे.