पुणे – मुळा-मुठा नद्यांचे होणारे प्रदूषण आणि त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृतीची आवश्यकता ही बाब लक्षात घेत शहरातील नदीप्रेमी संस्थांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नदीसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी नदीवरच्या 15 पुलांवर महाआरती करण्यात येणार आहे.
पुण्यातल्या सर्व स्तरातील नदीप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन “आम्ही पुणेकर’ या व्यासपीठाच्या माध्यमातून नद्या वाचवण्यासाठी एक मोहीम उभारली आहे. या मोहिमेचा प्रारंभ गेल्या आठवड्यात बाबा भिडे पुलावर नदीची आरती करून केला होता. मोहिमेच्या पुढील टप्प्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सकाळी 8 वाजता खडकवासला ते कल्याणीनगर अशा नदीवरच्या 15 पुलांवर नदी स्वच्छ राखण्यासाठीची महाआरती करण्यात येणार आहे.
नद्यांची गंभीर बनलेली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न
मुळा-मुठा नद्यांच्या काठी शेकडो वर्षांपूर्वी पुनवडी वसली. ज्या नद्यांनी हे शहर वसलेलं पाहिलं, हे शहर वाढताना विकसित होताना पाहिले, त्या नद्या अस्वच्छ होत असताना मात्र कुणी लक्ष दिलं नाही. मुळा-मुठाला आपण या शहराची माता म्हणतो, तरीही शहरातील कचरा, सांडपाणी या नदीत मिसळते. याच पाण्यावर भाजीपाला पिकतो. त्यामध्ये पाण्यात मासे जगतात आणि तो भाजीपाला, मासळी खाऊन पुणेकर आणि पंचक्रोशीतले नागरिक कॅन्सरसारख्या गंभीर व्याधींचे शिकार बनतात. ही सगळी परिस्थिती आता गंभीर बनलीय. ती बदलायला हवी. त्यासाठीच ही मोहीम उभारली असल्याचे मोहिमेत सहभागी नागरिकांकडून सांगण्यात आले.