पिंपरी – आपल्या देशात तीन हजारापेक्षा जास्त व्यवस्थापन कॉलेजेसमधून सुमारे साडे तीन लाख विद्यार्थी दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र त्यांच्यातील कार्यकुशलतेच्या अभावामुळे भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच आहे, असे मत टॅलेंट सेसमेंट ऍण्ड नॅलिटिक्स सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सांडू यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वतीने आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पुंबाच्या डॉ. सुप्रिया पाटील, श्वेता चव्हाण पाटील, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी प्रणाली फोकमारे हिला अष्टपैलू विद्यार्थिनीचा पुरस्कार देण्यात आला. दहा हजार रुपये व सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्राची पावडे हिला दुसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू विद्यार्थिनी पुरस्कार म्हणून सिल्व्हर मेडल व सात हजारांचा धनादेश देण्यात आला. रिद्धी वर्तक, पूजा अलोणे यांना विभागून तिसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ब्रॉंझ मेडल व 3 हजाराचा धनादेश देण्यात आला. यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 52 जणांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
सांडू म्हणाले की, आजचे तरुण योग्य व स्मार्टपणे करियर निवडत नसल्याने अपयशी ठरत आहेत. आज केवळ 3 टक्केच कुशल विद्यार्थी घडत आहेत. आवडीच्या क्षेत्रात करियर करा. आयुष्यात चूक करू नका, असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. मिसाळ यांनी केले. सूत्रसंचालन नेहा नाईक, निधी दत्ता यांनी केले. प्रा.मिश्रा यांनी आभार मानले.