मुबंई – भारताचा सलामीवीर इशान किशन आता एका नव्या वादात अडकला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान मानसिक विश्रांतीची मागणी करत तो मायदेशी परतला होता. त्याची विनंती बीसीसीआयने मान्यही केली होती. मात्र, प्रत्यक्षात तो दुबईत पार्टी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बीसीसीआय त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करु शकते तसेच त्याला नियमानूसार काही कालावधीसाठी संघातून बाहेरही ठेवू शकते त्यामुळे त्याच्या कारकीर्दीलाच त्याच्या या खोटे बोलण्यामुळे धोका उत्पन्न झाला आहे.
मानसिक थकवा आणि सतत प्रवास केल्यामुळे ईशानने बीसीसीआयकडे काही कालावधीसाठी विश्रांती मागितली होती, ती मान्य करण्यात आली व त्याला मायदेशी परतण्याची मुभाही दिली गेली. तसेच त्याला हा वेळ कुटुंबासोबत घालवता यावा असेही मत त्यावेळी बीसीसीआयने व्यक्त केले होते. मात्र, तो विश्रांती घेत मायदेशी परतला व काही दिवसांतच त्याने दुबई गाठली व सध्या तो विविध ठीकाणी फिरताना तसेच वेगवेगळ्या व्यक्तींसह पार्टी करतानाचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. त्यावरून आता बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे.
त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्याची तयारीही निवड समितीने केली होती मात्र, त्याने विश्रांती मागितल्यामुळे त्याच्या नावाचा विचार झाला नाही. आता तो पार्टीवरून टीकेचा धनी बनला आहे व त्याच्याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.