नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या आजपासून किमती 200 रुपयांनी कमी होणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्यामुळे आपल्या माता-भगिनींना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल असे पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनच्या देशवासियांनी शुभेच्छा दिल्या. हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणित करणारा असतो. गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळं माझ्या कुटुंबातील भगिनींना दिलासा मिळेल आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. माझी प्रत्येक बहीण आनंदी, निरोगी, सुखी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी,’देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 75 लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल. सर्व एलपीजी ग्राहकांसाठी म्हणजेच गॅसचा वापर करणाऱ्या 33 कोटी ग्राहकांना 200 रुपयांनी कमी किंमतीत गॅस मिळणार आहे, असे त्यांनी म्हटले.
पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात सिलेंडरमागे 200 रुपयांचे अनुदान मिळत राहील. सरकारने 75 लाख अतिरिक्त पीएम उज्ज्वला जोडण्यांना देखील मंजुरी दिली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामुळे एकूण पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींची संख्या 10.35 कोटी पर्यंत पोहोचणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी,”उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी 200 रुपये अनुदान होते, तर आजपासून त्यावर 200 रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना 400 रुपये अनुदान मिळणार आहे. 33 कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर 75 लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी 7680 कोटी खर्च येणार असल्याचे सांगितले.
उज्ज्वला सिलेंडरसाठी केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनसाठी 3600 रुपये खर्च करत असून आतापर्यंत 9.60 लाख महिलांना उज्ज्वला सिलेंडरचा लाभ देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. आताही यामध्ये 75 लाख नवीन महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.