मुंबई : कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. लंडन उच्च न्यायालयाने मल्ल्याची बँकरप्सी (म्हणजेच दिवाळखोर घोषित करण्याविषयीची) याचिका फेटाळून लावली आहे. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा पैसा वसूल होण्याची आशा निर्माण झाली आहे.
लंडन उच्च न्यायालयाने मल्ल्याच्या प्रॉपर्टीवर असलेलं सुरक्षा कव्हर हटवलं आहे. विजय मल्ल्या भारतीय बँकांना 900 कोटी रुपयांचा चूना लावून ब्रिटिशमध्ये लपून बसला आहे. मल्ल्याची किंगफिशर एअरलाईन्स बंद पडली आहे. आता भारतीय बँका मल्ल्याची भारतातील संपत्ती जप्त करुन आपलं कर्ज वसूल करु शकतील.
भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात मागणी केली होती की, विजय मल्ल्या याच्या भारतातील संपत्तीवर असलेलं सुरक्षा कव्हर हटवण्यात यावं. लंडन उच्च न्यायालयाचे चीफ इन्सॉल्वेंसी अँड कंपनीज कोर्टाचे न्यायमूर्ती मायकल ब्रिग्स यांनी भारतीय बँकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. विजय मल्ल्या याच्या संपत्तीला सुरक्षा कव्हर प्रदान करण्यासाठी कोणतीही पब्लिक पॉलिसी उपल्बध नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय.
विजय मल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे मल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे.
आर्थिक चणचणीमुळे कोंडीत सापडलेल्या मल्ल्याने लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती त्याने या याचिकेतून कोर्टाला केली आहे.