State Bank of India on Supreme Court| सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) निवडणूक रोख्याचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले होते. यासाठी एसबीआयकडून 30 जूनपर्यंतची मुदतवाढ देण्याच्या मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जावर आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. राजकीय पक्षांना निधी देण्याची निवडणूक रोख्यांची पद्धत घटनाबाह्य असल्याचा निकाल फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या ऐतिहासिक निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले होते.
राजकीय पक्षांना रोख्यांद्वारे किती पैसा मिळाला, याची माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यावेळी न्यायालयाने एसबीआयला दिले होते. मात्र रोख्यांसंदर्भातील माहिती देण्यास स्टेट बँक मुद्दाम विलंब करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी कोर्टाने या आधी जी मुदत दिली होती त्या मुदतीत स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर केला नाही म्हणून या बँकेवर अवमान कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती. त्यावरही आज सुनावणी होणार आहे.
कधी होणार सुनावणी? State Bank of India on Supreme Court|
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, जे बी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेले सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ दोन्ही याचिकांवर सुनावणीसाठी सकाळी 10:30 वाजता सुनावणी घेईल. 15 फेब्रुवारी रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने नावे गुप्त ठेऊन राजकीय निधीला परवानगी देणारी केंद्राची निवडणूक रोखे योजना रद्द केली, ही इलेक्ट्रोरल बॉंड पद्धत न्यायालयाने घटनाबाह्य ठरवली.
भाजपला अब्जावधी रूपयांचा निवडणूक निधी मिळाल्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, स्टेट बँकेला 12 एप्रिल 2019 पासून ते आतापर्यंत राजकीय पक्षांना प्राप्त झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती 13 मार्चपर्यंत संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही न्यायालयाने बँकेला दिले होते. मात्र बँकेकडून ही मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या रोख्यांमधून भाजपला अब्जावधी रूपयांचा निवडणूक निधी मिळाला आहे. पण हे पैसे नेमके कोणी दिले याचा तपशील दडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे, असा आरोप होत आहे. त्यामुळे भाजप सरकारसाठीही आजची सुनावणी महत्वाची असणार आहे.
हेही वाचा:
“….तर मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही”; शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया